नयनरम्य बाली - भाग ११ - अलविदा बाली Beautiful Bali - Part 11 - Goodbye Bali

बतूरचा ट्रेक पूर्ण करून हॉस्टेलवर पोहचलो तेव्हा अकरा वाजले होते.  प्रचंड थकवा वाटत होता. आणि झोपही येत होती. आज रात्री नऊचं परतीचं विमान होतं. कसा काय स्कूटर चालवत विमानतळ गाठणार मी? थोडी चिंता वाटत होती. एवढी दगदगीची रूपरेषा कशाला आखायची? मनात उगीच उलटसुलट विचार येत होते. हॉस्टेलच्या मॅनेजरला विचारलं थोडं उशिरा चेक आऊट केलं तर चालेल का? त्या रूमसाठी पुढचे काही बुकिंग नव्हते. मग तो म्हणाला ठीक आहे अजून दोन तास थांबू शकतोस. मी लगेच बेडवर आडवा झालो. मस्त तासभर झोप काढली. थोडं बरं वाटलं. दीडच्या सुमारास  आंघोळ करून सामान बांधून तिथून निघालो. मधे कुठे जेवायला थांबावं लागू नये म्हणून इथेच थोडा फ्राइड राईस खाऊन घेतला. किंतामानीवरून विमानतळ हे अंतर होते साधारण ७० किमी. दोन तासांचा हिशोब ठेवला तरी चारपर्यन्त सहज विमानतळावर पोहोचता येणार होते. खरं तर या परतीच्या प्रवासात पुरा बेसाकीह हे एक प्रसिद्ध मंदिर बघायचा विचार होता. पण आता वेळ कमी होता. शिवाय या मंदिरात नेहमीच प्रचंड गर्दी असते म्हणे. त्यामुळे रांगेत उभं राहून तिकीट काढून आत जायचे, फिरायचे, फोटो काढायचे वगैरे गोष्टींसाठी अंगात अजिबात त्राण उरले नव्हते. मग तो विचार सोडून दिला. विमानतळाचे लोकेशन गुगलवर टाकले आणि निघालो.  


वातावरण छान होते. मध्य बालीचा हा भाग थोडा उंचीवर असल्याने इथे हवा कायमच थोडी थंड असते. मंगळवार असल्याने आज स्थानिक पर्यटकांची फार गर्दी नव्हती. रस्ते मोकळेच होते. घाट ओलांडून ऊबुदच्या रस्त्याला लागलो. हा भाग म्हणजे बालीमधला  अॅ ग्रो टुरिझमसाठी प्रसिद्ध असलेला भाग. कोपी लेवाक नावाची एक अतिशय महाग पण प्रसिद्ध अशी कॉफी इथे बनते. एशियन पाम सिवेट म्हणजेच रानमांजराचा एक प्रकार. हे मांजर कॉफीची फळं खातं आणि न पचलेल्या बिया विष्ठेतून बाहेर टाकतं. याच बिया गोळा करून त्यापासून कॉफी बनवली जाते. याला एक वेगळीच अद्भुत चव असते म्हणे. मला तर ऐकूनच किळस वाटली. ही अशी कॉफी प्यायला जगभरातून पर्यटक येतात. आता तर हा प्रकार अत्यंत व्यावसायिक झाला आहे. रानमांजरांना पकडून पिंजऱ्यात ठेवलं जातं. मग त्यांना मुद्दामहून कॉफीची फळं खायला घातली जातात. मग त्यांची विष्ठा गोळा करून पुढची प्रक्रिया केली जाते. या कॉफीच्या एका कपाची किंमत $३५ ते $१०० असते म्हणे! काय तरी एकेक श्रीमंतांची थेरं! रस्त्यात अशी कॉफी विकणारी बरीच दुकानं दिसत होती. शिवाय मोठ-मोठी कॉफीची शेतंदेखील दिसत होती. एक तर कॉफी हे इथलं मूळचं झाड नाही. आणि कॉफीची फळं हा रानमांजरांचा मुख्य आहारही नाही. हा सगळाच प्रकार मला पर्यावरणदृष्ट्या चुकीचा वाटत होता. असो. त्याकडे दुर्लक्ष करून मी पुढे निघालो.  

ऊबुद ओलांडलं आणि जरा वेळ कॅफे मध्ये थांबलो. तीन वाजले होते. मस्त कॉफी आणि एक सँडविच मागवले. एकीकडे फोन चार्ज करायला लावला. गुगल वर दिशादर्शन चालू असते तेव्हा बॅटरी कशी संपते कळतच नाही. खाता खाता जेवढी शक्य होईल तेवढी बॅटरी चार्ज करून घेतली. मग पुढे निघालो. अपेक्षेनुसार चार वाजता कुटाला पोहोचलो. सहा वाजता विमानतळाजवळच्या पार्किंग लॉट मध्ये स्कूटर परत करायची होती. मग तसेच तिथून चेक इन करायचे होते. थोडक्यात अजून दोन तास वेळ होता. मग जवळच्या एका स्पामध्ये शिरलो. सात दिवसांच्या प्रवासाने आणि स्कूटर चालवण्याने अंग उबून आलं होतं. आता अनायासे थोडा वेळ मिळाला आहेच तर जरा रीलॅक्स करू. तासभर छान मसाज करून घेतला. मग एक गरमागरम चहा घेतला. पावणेसहा वाजलेच होते. स्कूटरच्या कंपनीचा ईमेल आला होताच. बाहेर पडलो आणि लक्षात आलं पेट्रोल भरायचं राहूनच गेलं! स्कूटर परत देताना टाकी पूर्ण भरून देणे अनिवार्य होते. अन्यथा डिपॉजिट मधून वजा केले जातील अशी अट होती. मग काय, निघालो पेट्रोल पंप शोधत. संध्याकाळची वेळ असल्याने रस्त्यावर ट्राफिक वाढलं होतं. पटकन गुगल वर पेट्रोल पंपही सापडेना. मग असाच निघालो मुख्य रस्त्यावरून. अर्धा तास फिरल्यावर शेवटी एकदाचा पेट्रोल पंप सापडला. मग पेट्रोल भरून विमानतळ गाठेपर्यन्त पवणेसात वाजले. स्कूटरच्या कंपनीचा माणूस बिचारा तिथेच उभा होता ताटकळत. त्याला सॉरी म्हणून स्कूटर परत केली आणि विमानतळाकडे निघालो.  

चेक इन केलं आणि फूड कोर्टकडे वळलो. बोर्डिंगला अजून दोन तास होते. एक बियर मागवली आणि पीत बसलो. असंख्य फोटो काढलेले होते. ते एकीकडे बघत बसलो. शेजारी एक वयस्क बेल्जियन जोडपं बसलं होतं. माझा कॅमेरा बघून काका विचारू लागले कुठला आहे वगैरे. मग आमच्या गप्पा रंगल्या. काका कॅननचा एक अत्यंत महागडा कॅमेरा घेऊन फिरत होते. एकंदरीत फोटोग्राफी मध्ये बराच रस होता त्यांना. काका आणि काकू गेले दोन आठवडे बालीमध्ये फिरत होते. मी बघितली त्याच्या निम्मीदेखील ठिकाणं त्यांनी बघितली नव्हती. पण जिथे गेले होते तिथे त्यांनी मनसोक्त वेळ व्यतीत केला होता. युरोपियन लोकांची ही फिरण्याची तऱ्हा मला कायमच अचंबित करते. हे लोक फिरतात ते जग समरसून अनुभवण्यासाठी.  उगीच पळापळ नाही. आणि ग्रुपने येऊन अंताक्षरी किंवा हाऊजी असला धांगडधिंगा नाही. आपलं आपण फिरायचं, स्थानिक लोकांची जीवनपद्धती बघायची, फोटो वगैरे काढायचे आणि एक समृद्ध अनुभव गाठीशी बांधून परत जायचं. मला कधी असं फिरायला जमेल का याचा विचार मी करू लागलो. पण लक्षात आलं की आपला पिंडच मुळी भटका आहे. एका जागी असे दोन-चार दिवस काही न करता घालवणं हे सर्वथा अशक्य आहे. असो. ज्याची त्याची फिरण्याची तऱ्हा न्यारी. मी काकांना विचारलं तुमचं इनस्टाग्राम  किंवा फेसबुक वर प्रोफाइल आहे का. यावर ते हसायला लागले. या नव्या पिढीच्या गोष्टी काही जमत नाहीत आपल्याला असं सांगू लागले. मला एकदम आई-बाबांची आठवण झाली. देश कोणताही असो माणसं सारखीच असतात. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला मुठीत घेऊन जगभर संचार करणारी आमची पिढी आणि त्याच तंत्रज्ञानाच्या मागे न धावताही आयुष्यातले सगळे क्षण भरभरून जगणारी ही मागची पिढी. काय गंमत आहे नाही!     

तेवढ्यात बोर्डिंग सुरू झाल्याची सूचना झाली. येतानाचं विमानही क्वालालंपूर मार्गे होतं. आणि क्वालालंपूरला सात तासांचा लेओवर होता! क्वालालंपूरला उतरलो तेव्हा स्थानिक वेळेनुसार रात्रीचे दोन वाजले होते. पुढचं विमान सकाळी आठ वाजता होतं. लाऊंज वगैरे मिळतेय का चौकशी केली. पण ते सगळंच आवाक्याबाहेर होतं. शेवटी असाच एका खुर्चीवर बसून झोपायचा प्रयत्न करू लागलो. विमान प्रवासातले हे असे प्रसंग सगळ्यात असह्य असतात. पण स्वस्तात प्रवास करायचा असेल तर हे सगळं सोसावं लागतच. असो. म्हणता म्हणता त्रिचीच्या विमानाची घोषणा झाली आणि मी एकदाचा विमानात बसलो. आपल्या देशात परत जातोय याचा आनंद होताच. यथावकाश विमान त्रिचीच्या धावपट्टीवर उतरलं. विमानतळाच्या  बाहेर पडताना मन अगदी भरून आलं होतं. कसली adventurous ट्रीप होती ही! एकापेक्षा एक सुंदर बीचेस, त्याहून सुंदर मंदिरे, snorkeling चा थरार, मग ज्वालामुखीवर केलेली चढाई, सगळंच भारी होतं. शिवाय प्रवासात भेटलेली वेगवेगळी माणसं आणि त्यांचे जीवनानुभव!  ठरवलेल्या जागांपैकी बहुतेक सगळ्या जागा बघून झाल्या होत्या. स्कूटरवर मनसोक्त हुंदडून झालं होतं. जगातली एक प्रसिद्ध जागा पुरेपूर अनुभवल्याचं समाधान वाटत होतं. अनुभवांची शिदोरी अजूनच परिपक्व झाली होती.    

समाप्त                                                                                 

नयनरम्य बाली - भाग १० - बतूर ज्वालामुखीवर आरोहण Beautiful Bali - Part 10 - Hike to Batur volcano

बालीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले ज्वालामुखी. एकंदरीत इंडोनेशियामध्ये १३९ ज्वालामुखी आहेत. हा सगळं देशच pacific ring of fire वर वसलेला आहे. त्यामुळे वरचेवर भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक या गोष्टी इथे सामान्य आहेत. बाली मध्ये एकूण चार  ज्वालामुखी आहेत. त्यांपैकी अगुंगचा उद्रेक २०१९ मध्ये झाला होता. आणि त्याचा उद्रेक हा अजूनही सुरू आहे. बतूर हादेखील जागृत ज्वालामुखी आहे. त्याचा शेवटचा उद्रेक २००० साली झाला होता. बाकीचे एक तर मृत आहेत किंवा अर्धमृत आहेत. किंतामानी हे गाव बतूरच्या caldera मध्येच वसले आहे. बतूरवर चढाई करण्यासाठीच मी इथे मुक्काम केला होता. बतूरवर चढाई ही बालीमधली एक अत्यंत लोकप्रिय गोष्ट आहे. असंख्य पर्यटक इथे सूर्योदय बघण्यासाठी रात्री चढाई करतात. त्यासाठी नियोजित गाइडेड ट्रेक असतात. असाच एक ट्रेक जॉइन करायचा माझा विचार होता. तशी आगाऊ सूचनादेखील मी हॉस्टेलला दिली होती.  

बतूर ज्वालामुखी 


कोणीतरी दार वाजवले आणि मी जागा झालो. हॉस्टेलवरचा कर्मचारी जेवण तयार आहे म्हणून सांगायला आला होता. मी एकदम भानावर आलो. दिवसभरच्या बाइक चालनाने मी प्रचंड थकलो होतो. पण भूकसुद्धा लागली होती. मग जेवायला बाहेर आलो. बाहेर हॉस्टेलमधल्या तरुणांचा एक ग्रुप जमला होता. एक जोडपं फ्रान्सचं होतं. एक मुलगी जर्मनीची तर एक बेल्जियमची होती. ओळखपाळख झाली. माझं तोडकंमोडकं जर्मन ऐकून सगळे एकदम इम्प्रेस झाले होते. माझी लगेचच सगळ्यांशी मैत्री झाली. आज रात्री  निघणार्‍या बतूर ट्रेकचं प्लॅनिंग सुरू होतं. आता मध्यरात्री उठून ट्रेकला जायचं अगदी जिवावर आलं होतं. मी तर जवळपास न जायचा निर्णयच घेतला होता. पण इथे जमलेला ग्रुप बघून माझा निर्णय बदलला. इथवर आलोच आहे तर करून येऊ ट्रेक. मी ट्रेकचे आगाऊ पैसे भरले आणि जेवण आटोपून परत रूमवर झोपायला गेलो. पण झोप काही येईना. फोनला नेटवर्क नव्हतच. उगीच सोबत आणलेलं पुस्तक चाळत बसलो. दहाच्या सुमारास थोडा वेळ आडवा झालो. जरा झोप लागतेय तेवढ्यात दारावर टकटक झालीच. रात्रीचे अडीच वाजले होते. ट्रेक सुरू करायची वेळ झाली होती. काल जमलेला सगळा ग्रुप आधीच आवरून तयार होता. वेळेच्या बाबतीत यूरोपियन लोकांचा काटेकोरपणा कौतुकास्पद असतो. थोडा चहा घेऊन आम्ही सगळे निघालो.  

गाडीने डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून ट्रेक सुरू होणार होता. हवा गार होती. आभाळात तार्‍यांचा खच पडला होता. ढग अजिबात दिसत नव्हते. म्हणजे आज सूर्योदय सुंदर दिसणार या कल्पनेने आम्ही अजून उत्साहात चढू लागलो.  ट्रेकचा मार्ग बारीक वाळूने भरलेला होता. त्यामुळे चढताना ग्रीप मिळत नव्हती. चढण फारशी तीव्र नसली तरी बारीक वाळूने चढण जास्त अवघड वाटत होती.  धापा टाकत आम्ही माथ्यावर पोहोचलो. इथे तर चक्क लाकडाचे बाक लावून स्टेडिअम सारखी बसायची व्यवस्था केली होती. इथे बसून सूर्योदय बघायचा? माझी जरा निराशाच झाली. पण आमचा गाईड म्हणाला, नाही, आपलं "पॅकेज" वेगळं आहे. आम्ही थोडे जास्त पैसे भरले असल्याने आम्हाला माथ्यावरच्या थोड्या अजून उंच असलेल्या भागावर जायला मिळणार होते. तिथे एक जण प्रत्येक ग्रुपचे कोणते पॅकेज आहे ते तपासत होता! या जागेचे झालेले कमालीचे व्यावसायीकरण  बघून मी अचंबित झालो! ग्रुप मधल्या एकाकडून हेदेखील ऐकलं की इथे स्थानिक लोक पर्यटकांना स्वतंत्र येऊच देत नाहीत. यायचं तर गाईड सोबतच नाहीतर नाही. सुरक्षेच्या दृष्टीने योग्यच आहे म्हणा. कारण ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूकंप कधीही होऊ शकतो. पण या गोष्टीत स्थानिक तरुणांचा रोजगार सुरक्षित करणे हीच बाब जास्त उठून दिसत होती. असो. आमच्या पॅकेज मध्ये ज्वालामुखीच्या एका बाजूने चढाई आणि दुसर्‍या बाजूने उतरणे आणि शिवाय नाश्ता हे सगळे अंतर्भूत होते. ठरल्याप्रमाणे आम्ही डोंगराच्या थोड्या वरच्या भागात जाऊन थांबलो. इथे फक्त आम्ही आणि अजून एक ग्रुप होता. आम्ही तसे लवकर पोहोचल्याने इथे तशी शांतता होती. पहाटेचे पाच वाजत आले होते. सूर्योदय व्हायला अजून तासभर अवकाश होता. तार्‍यांनी भरलेलं आकाश सुंदर दिसत होतं. मध्येच आकाशगंगेचा धूसर पट्टा दिसत होता. दूरवर किंतामानीतले दिवे लुकलुकताना दिसत होते. थंड वारा सुटला होता. मी ट्रायपोडवर  कॅमेरा लावला आणि आकाशाचे फोटो काढण्यात दंग झालो.  

तार्‍यांनी भरलेले आकाश आणि दरीत लुकलुकणारे दिवे 

सहा वाजत आले तसे पूर्व क्षितिज उजळू लागले 

अचानक वाहत आलेला ढगांचा लोट 


सहा वाजत आले तसे पूर्व क्षितिज उजळू लागले. आधी लाल, मग केशरी, गुलाबी, सोनेरी अशी रंगांची उधळण होऊ लागली. आता सूर्यबिंब लवकरच वर येणार म्हणून आम्ही उत्सुकतेने पूर्वेकडे बघत होतो. तेवढ्यात कुठून कोण जाणे एक ढगांचा प्रचंड लोट त्या डोंगरावर वाहत आला. अक्षरशः काही सेकंदांत त्या ढगाने अवघ्या डोंगराला कवेत घेतलं. हातातोंडाशी आलेला सूर्योदय त्या ढगाने एका क्षणात आमच्याकडून हिरावून घेतला. आम्ही सगळेच निराश झालो. अगदी काही मिनिटं आधी स्वच्छ असलेलं आकाश असं ढगांनी भरून जावं आणि ज्या जादुई क्षणासाठी इथवर आलो होतो तो असा निसटून जावा हे अगदीच निशाजनक होतं. पण शेवटी निसर्गच तो. त्याची तक्रार कोणापुढे करायची? असो. ज्या वेगाने तो ढग आला त्या वेगाने तो कदाचित निघूनही जाईल अशा अपेक्षेने आम्ही तिथेच थांबलो. वार्‍याने वाहणारे ढगांचे लोट त्या सोनेरी वातावरणात जादुई वाटत होते. थोड्याच वेळात सूर्यबिंब वर आले. त्याच्या प्रखर प्रभेने सारा आसमंत उजळला गेला. ढगांनी पूर्व दिशा रोखून ठेवली असली तरी पश्चिमेकडचे ढग मध्येच बाजूला जाऊन समोरच्या दरीचे दृश्य दाखवत होते. वारा भन्नाट सुटला होता. अंगात हुडहुडी भरत होती. थोड्या वेळाने तो ढगांचा आणि वार्‍याचा खेळ थांबला. थोडी उघडीप निर्माण झाली. एखादं लहान मूल इकडेतिकडे उद्या मारून, खेळून, मस्ती करून एकदाचं झोपी जावं तसं काहीतरी घडत होतं. आणि बघतो तर काय, खाली दरीत ढगांची मुलायम चादर पसरली होती. नुकताच पिंजलेला कापूस अलगद अंथरून ठेवावा तसे वाटत होते. वर स्वछ निळे आकाश दिसत होते. दूरवर अबंग आणि अगुंग या डोंगरांची त्रिकोणी शिखरे दिसत होती. ढग नसते तर समुद्रही दिसला असता. सारेच दृश्य अवर्णनीय होते. किती फोटो काढावेत किती नाही असं झालं होतं.  

सूर्य वर आला आणि सारे वातावरण सोनेरी झाले 

ढगांच्या दुलईतून डोकं वर काढणारी अबांग आणि अगुंग ची शिखरे  

मध्येच ढग बाजूला सरून दरीचे दर्शन घडवत होते 

इथे एक फोटो तर आवश्यकच होता!


तिथे मनसोक्त फोटो काढून आम्ही खाली उतरु लागलो. ही वाट सुद्धा निसरडीच होती. पण इथे बारीक वाळू पेक्षा चिखल जास्त होता. मुख्य शिखर पार करून आम्ही मधल्या सपाट भागावर पोहोचलो. इथे आणखी एक आश्चर्य आमची वाट बघत होतं. ते म्हणजे दगडातून येणारे वाफेचे फवारे. ज्वालामुखी जागृत असल्याची एक खूण. इथे कुठल्याही दगडाला हात लावला तरी गरम लागत होतं. आम्ही चिखल आणि गवत बघत चाललो होतो. मग मध्येच गाईड म्हणाला, चला नाश्ता करूया. इथे मध्येच नाश्ता? नुसती फळं आणि सुकामेवा खायचं की काय नाश्त्याला? पण इथेच तर गम्मत होती. आमच्या गाईडने गरम दगडाखाली खड्डा खणून त्यात अंडी आणि केळी घातली आणि वर फोईल पेपर लावून खड्डा बंद केला. ही होती आमची नैसर्गिक चूल! दहा मिनिटातच त्याने खड्डा उकरून अंडी आणि केळी बाहेर काढली. अंडी तर व्यवस्थित उकडली गेली होती. त्याला थोडासा गंधकयुक्त वास येत होता. आणि केळ्यांचा तर चक्क जॅम तयार झाला होता. तो जॅम ब्रेडवर लावून आम्ही खाऊ लागलो. समोर ढगांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच होता. ज्वालामुखीच्या कुशीत बसून त्याच्याच उष्णतेवर शिजवलेला नाश्ता खाण्याचा अनुभव अगदी शब्दातीत होता. पेटपूजा करून आम्ही पुढे निघालो. उतरताना एका ठिकाणी समोरच्या दरीत नुसती ढगांची चादर दिसत होती. मी तिथे जरा वेळ थांबलो. आणि बघतो तर काय, माझी सावली त्या ढगांवर पडली होती आणि त्याभोवती गोलाकार इंद्रधनुष्य, ज्याला इंद्रवज्र म्हणतात, निर्माण झाले होते! जेव्हा आपण उंचीवरच्या ठिकाणी असतो, समोर ढग असतात, आणि मागून सूर्यप्रकाश असतो तेव्हा असे इंद्रवज्र दिसते म्हणतात. आपल्या हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा इंद्रवज्रासाठी प्रसिद्ध आहे. इथेही तसाच योग जुळून आला होता. हे इंद्रवज्र म्हणजे आजच्या दिवसात दिसलेल्या निसर्गाच्या किमयेचा कळसाध्याय होता!  

इंद्रवज्र! 

खड्ड्यातली नैसर्गिक चूल 

उताराची रम्य वाट 


जसजसे खाली उतरू लागलो तसा उकाडा वाढू लागला. आता पुन्हा बारीक वाळूचा प्रदेश सुरू झाला होता. ढगांची चादर विरून गेली होती. स्वच्छ निळं आकाश दिसत होतं. बतूर ज्वालामुखीचा caldera सुस्पष्ट दिसत होता. काल रात्री ज्या तीव्र वळणाच्या घाटाने मी आलो होतो तो रस्ताही दिसत होता. थोडं पुढे जाताच बतूरची दोन उपविवरं दिसू लागली. त्यांपैकी एक हे २००० साली झालेल्या उद्रेकादरम्यान निर्माण झाले होते. तिथून प्रचंड वाफा येत होत्या. सगळीकडे गंधकाचा वास भरून राहिला होता. गंधकयुक्त पिवळी मातीही इकडेतिकडे पसरलेली दिसत होती. तिथे थोडेफार फोटो काढून आम्ही पुढे निघालो. आता उतार संपला आणि राखाडी वाळूचा सपाट भाग सुरू झाला. या मऊ वाळूतून चालणे जिकिरीचे होत होते. पाय थरथरत होते आणि झोपही येत होती. कधी एकदा हॉस्टेल वर पोहोचतोय असं झालं होतं. अखेरीस आम्ही मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचलो. आमची गाडी उभीच होती. गाडीत बसून आम्ही एकदाचे हॉस्टेलवर पोहोचलो.  

ज्वालामुखीची उपविवरे आणि त्यातून येणार्‍या वाफा  

वाफांची ऊब घेताना ;)

विवरातले गंधकाचे थर 

राखाडी वाळूचे विस्तीर्ण मैदान 

क्रमशः 

नयनरम्य बाली - भाग ९ - किंतामानीची अंधारवाट Beautiful Bali - Part 9 - The dark road to Kintamani

सेकंपूलचा धबधबा बघून जेवण आटोपून मी लगबगीने किंतामानीकडे निघालो. अजून साधारण ६० किमी अंतर होते. साडेचार वाजत आले होते. अंधार व्हायच्या आत पोहोचेन की नाही याची धाकधूक वाटत होती. अंधारापेक्षा जास्त भीती मला फोनची बॅटरी संपायची वाटत होती. पॉवर बँक होती म्हणा. पण फोन बाइकवर लावलेला असताना चार्ज कसा करायचा ही अडचण होती. आजूबाजूच्या निसर्गाकडे मुश्किलीने दुर्लक्ष करत मी निघालो. रस्ता वळणा-वळणाचाच होता. बालीच्या मध्य भागातून मी आता उत्तर भागात चाललो होतो. बालीचा उत्तर भाग तसा पर्यटनापासून दूर आहे. इथली गावं त्यामानाने गरीब दिसत होती आणि रस्त्यांची अवस्था देखील यथातथाच होती. डोंगर उतरून मी उत्तर किनार्‍यावर असलेल्या एका गावात पोहोचलो. गावाच्या मध्यवर्ती भागात एक मोठा मासळी बाजार होता. बाजार बंद व्हायची वेळ झाली असावी. सगळीकडे एकच लगबग सुरू होती. मासळीचा वास सगळीकडे भरून राहिला होता. अगदी वर्सोव्याच्या कोळीवाड्यात असावं तसं वातावरण होतं. मी त्या गर्दीतून हळहळू वाट काढत पुढे जात होतो. आणि तिथले लोक हा कोण प्राणी इथे आला आहे अशा नजरेने माझ्याकडे बघत होते. परदेशी पर्यटक बालीच्या या भागात किती दुर्मिळ असावेत याची कल्पना मला आली. आपण नक्की बरोबर रस्त्यावर आहोत की नाही याची शंकाही येऊ लागली. मग एका ठिकाणी थांबलो आणि रस्त्यावरच्या एका माणसाला किंतामानीचा रस्ता विचारला. पण इथे लोकांना इंग्रजीचा काहीएक गंध नव्हता. मग आणखी चार जण माझ्याभोवती गोळा झाले. मी हरवलो आहे असा त्यांचा समज झाला आणि मग ते मला तोडक्या मोडक्या इंग्रजीत ऊबुद आणि कुटाचा रस्ता सांगू लागले. मग मी फोनवर किंतामानी टाइप करून दाखवले. मग त्यांच्या लक्षात आले मला कुठे जायचे आहे. तेवढ्यात एक तरुण कुठून तरी उगवला आणि त्याने समजेल अशा इंग्रजीत किंतामानीचा रस्ता सांगितला. खरं तर मी रस्ता चुकलोच होतो. वीसेक किमीचा फटका पडणार होता. आधीच उशीर झालेला. माझे टेंशन अजूनच वाढले. 

 
पुन्हा एकदा झाडीत वळलेला रस्ता 

कलत्या उन्हात चकाकणारी झाडे 

मी योग्य रस्त्यावर स्कूटर वळवली आणि वेग वाढवला. हा रस्ता उत्तर किनार्‍याला  स्पर्शून  पुन्हा मध्य भागातल्या डोंगराळ भागात वळत होता. हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावं तसं झालं होतं. आधीच अंधार पडत आला होता आणि रस्ता अजून डोंगराळ आणि गर्द झाडीच्या भागात शिरत होता. शेवटी मी अंधाराची चिंता सोडून दिली. जे होईल ते होईल. Adventure नाही तर ट्रीप ची मजा कशी? बाप्पा मोरया म्हणत समोरच्या चढावर गाडी दामटली. रस्ता सुंदर होताच. मध्येच शेती, मध्येच जंगल, मध्येच तीव्र  उताराच्या  टेकड्या, आणि त्यात वसलेली चिमुकली गावं असे भूदृश्य होते. मी इकडेतिकडे बघत चाललो होतो. सूर्यास्त व्हायला थोडा वेळ होता. पण ऊन लाल-केशरी झाले होते. मध्येच एका गावात एक प्रशस्त आणि रेखीव मंदिर दिसलं. त्यातल्या उतरत्या  छपरांच्या मनोर्‍यांवर लाल-केशरी ऊन सांडलं होतं. मला थांबून फोटो काढायचा मोह आवरेना. तसंही अंग जरा आखडलंच होतं. मग तिथे थांबलो आणि एक-दोन फोटो काढले. थोडं स्ट्रेचिंग केलं. डोंगरमाथ्यावरच्या त्या गावात थंड हवेचे सुखद झोत येत होते. तो क्षण असाच फ्रीज व्हावा असं वाटत होतं. काहीतरी वेगळीच जादू होती त्या जागेत. फार वेळ रमलो तर इथेच अंधार व्हायचा असं म्हणून मी पुढे निघालो.

पाईन वृक्षांच्या रानात शिरलेला रस्ता 

रस्त्यात दिसलेले सुरेख मंदिर 

 
आता रस्ता अजूनच गर्द रानात शिरला. उंच आणि महाकाय असे पाईन वृक्ष दिसत होते. मध्येच ढगांचे लोट वाहताना दिसत होते. हवा अजूनच थंड झाली होती. आपण अजून उंचीवर चढत आहोत हे जाणवत होतं. एक वळण घेतलं आणि समोरचं दृश्य बघून मी हबकलोच. स्कूटर बाजूला लावली आणि रस्त्याच्या कडेला आलो. समोर विशाल दरी दिसत होती. आणि त्यात तीन त्रिकोणी डोंगर दिमाखात उभे दिसत होते. हेच ते तीन ज्वालामुखी - अगुंग, अबांग, आणि बतूर. अस्ताला जाणार्‍या सूर्याची प्रभा अवघ्या आसमंतात फोफावली होती. निळा, केशरी, लाल, राखाडी अशा काहीशा रंगांचे मिश्रण असावे तसे आकाश दिसत होते. थंड हवेचे लोट दरीतून उसळून वर झेपावत होते. समोरची दरी म्हणजे बतूर ज्वालामुखीचा caldera होता. उद्या याच ज्वालामुखीवर चढाई करायला जायचं होतं. इथे उभा राहून मी जणू काही त्या डोंगराला नमन करत होतो. चुकलेल्या रस्त्याने मला त्या अद्भुत जागी आणून ठेवलं होतं. आणि त्या डोंगरांचे मला दर्शन घडावे म्हणूनच जणू काही सूर्य क्षितिजावर रेंगाळला होता. माझ्या अंगावर शहारे उमटले. दिव्यत्वाची अनुभूती ती हीच का? ती कोणाला कशी आणि कोणत्या क्षणी येईल ते सांगता येत नाही म्हणतात. हे तसंच काहीतरी होतं बहुतेक. काही क्षण तर मला काय करावे सुचेना. तसाच डोळे मिटून शांत उभा राहिलो. ते दृश्य मनाच्या कॅमेरावर व्यवस्थित कोरून घेतलं. बाजूला एक लहानसे दुकान होते. तेही बंद होत आले होते. मी चटकन एक कॉफी घेतली आणि समोरचे दृश्य बघत पिऊ लागलो. एवढ्या प्रवासानंतर गरम कॉफी सुखद वाटत होती. तेवढ्यात अंधार झालाच.  

तीन ज्वालामुखींचे अद्भुत दर्शन 

अजून शेवटचे १५ किमी बाकी होते. आता थोडेच अंतर उरले आहे. अर्ध्या तासात हॉस्टेलवर पोहोचूच अशा विचारात मी स्कूटर चालू केली. रस्ता उताराचा होता. थोडीफार वस्ती दिसत होती. हवेतला गारठा वाढला होता. फोनची बॅटरी केवळ १०%  शिल्लक होती. एक वळण आले आणि अचानक तीव्र वळणांचा घाट सुरू झाला. मधूनच कुठे पुन्हा घाट सुरू झाला हे मला समजेना. मग लक्षात आले की आपण caldera मध्ये उतरत आहोत. किंतामानी हे गाव मुळात त्या caldera मध्येच वसलेलं होतं. बाईक बरीच वर्षं चालवत असलो तरी अंधारात चालवायचा तेवढा अनुभव नव्हता. शिवाय स्कूटरचा दिवा म्हणजे असून नसल्यासारखा. रस्त्याची अवस्था चांगली असली तरी वळणे तीव्र होती. पुढचे वळण कसे येणार आहे याचा अंदाज धड येत नव्हता. त्यात माझी बॅग स्कूटरवर दोन पायांच्या मध्ये ठेवलेली. ती पडेल की काय याचीही भीती वाटत होती. कधी एकदा हा घाट संपतोय आणि मी हॉस्टेलवर पोहोचतोय असं झालं होतं. नशिबाने थोड्या वेळात तो घाट संपला. अजूनही रस्ता सरळ नव्हताच. पण किमान तीव्र वळणे आणि उतार तरी संपले होते. हुश करून पुढे जाऊ लागलो. पुढून एक गाडी जात होती. तिच्याच मागे-मागे जात राहिलो. सगळा परिसर  निर्मनुष्य होता. वस्तीची कुठलीच चिन्हं  दिसत नव्हती. अशा परिसरात हॉस्टेल बांधले असेल? आपण बरोबर जातो आहोत ना? फोनची बॅटरी संपली तर काय करायचे? असे हजारो प्रश्न मनात पिंगा घालत होते. 

थोड्या वेळात आजूबाजूला काही घरं दिसू लागली. तसं सामसूमच होतं सगळं पण आजूबाजूला वस्ती आहे हे बघून जरा हायसं वाटलं. तेवढ्यात हॉस्टेलच्या नावाची पाटी दिसली. मुख्य रस्त्यावरून डावीकडे एक अरुंद वाट डोंगरावर चढत होती. मी स्कूटर आत दामटली. हा रस्ता कच्चा होता. नुसते दगड-धोंडे पसरवून ठेवले होते आणि त्यावर बारीक खडी टाकली होती. आपल्याकडे खड्डे बुजवण्याच्या नावाखाली करतात तसला जुगाड इथेही केलेला दिसत होता. त्यातून वाट काढत मी चढावावर गाडी रेटत होतो. आणि नेमकं एका वळणावर स्कूटरचं पुढचं चाक दोन दगडांच्या मध्ये अडकलं! कितीही जोर लावला तरी बाहेर निघेना! शेवटी उतरून गाडी नुसती बाहेर ओढायचा प्रयत्न करू लागलो. पण तेही जमेना. आधीच दिवसभराच्या दगदगीने दमलो होतो. आणि आता हॉस्टेल ढेंगभर अंतरावर असताना ही स्कूटर अशी अडकलेली. काय करावं काही सुचत नव्हतं. तेवढ्यात समोरून एक बाईक येताना दिसली. मला बघून बाईकवाला थांबला. मला मदतीची गरज आहे त्याच्या लक्षात आलं असावं. त्याने थांबून विचारपूस केली. इथे एक तरुण बर्‍यापैकी इंग्रजीत बोलतोय हे बघून मला हायसं वाटलं. मग आम्ही दोघांनी मिळून स्कूटरचं अडकलेलं चाक बाहेर काढलं. मी तर घामाघूम झालो होतो. आता पुढचं एवढसं अंतरही मी चालवू शकेन असं वाटत नव्हतं. मी त्याला  मला हॉस्टेल पर्यन्त सोडायची विनंती केली. मग मी मागे बसलो आणि त्याने त्या भयानक रस्त्यावरून मोठ्या शिताफीने मार्ग काढत मला हॉस्टेलवर आणून सोडलं. त्याचे किती आभार मानू किती नाही असं झालं होतं. तो तरुण माझ्या हॉस्टेलच्या समोरच असलेल्या एका होमस्टेचा मालक होता. उद्या सकाळी कॉफीला होमस्टे वर नक्की ये असं आग्रहाचं निमंत्रण देऊन तो निघून गेला.  

एकदाचं मी हॉस्टेलवर चेक इन केलं. इथे भाडं कमी असल्याने मी हॉस्टेल असलं तरी स्वतंत्र खोली बूक केली होती. सगळा परिसर अतिशय रम्य होता. मी खोलीत शिरलो, आंघोळ केली आणि बेडवर आडवा झालो. कसला adventurous दिवस होता याची उजळणी करता करता डोळा कधी लागला ते कळलंच नाही.  

क्रमशः 

नयनरम्य बाली – भाग ८ – उलून दानू मंदिर आणि सेकंपुल धबधबा Beautiful Bali – Part 8 – Ulun Danu temple and Sekempul waterfall

सकाळी साडेसातलाच उठून तयार झालो. आज तसा लांबचा प्रवास होता. नाश्ता केला आणि स्कूटर चालू केली. ऊबुद मधला राजवाडा आणि मार्केट काल बघायचं राहून गेलं होतं. आणि ते नऊच्या पुढेच उघडणार होतं. मग तिथे जायचा विचार सोडून दिला आणि थेट उलून दानू मंदिराचे लोकेशन गूगल वर टाकले आणि निघालो. जसे ऊबुद मागे पडले तशी हिरवीगार भातशेती सर्वत्र दिसू लागली. मधेच घनदाट झाडी लागत होती. बालीचा हा मध्य भाग काहीसा उंचावर आहे. समुद्रापासून लांब असल्याने इथे हवा जरा थंड होती. अगदी तळकोकणातल्या गावांतून जावं तसं वाटत होतं. लाल माती तेवढी नव्हती. एकंदरीत बालीतल्या रस्त्यांवरून स्कूटरने फिरणे हा एक सुरेख अनुभव होता. तुळतुळीत काळे डांबर रास्ते, कुठेही खड्डे नाहीत, बाजूने पाणी वाहून जायला व्यवस्थित बांधलेले चर, बाजूने लावलेली फुलझाडे, रस्त्यावर लावलेले दिशादर्शक, सगळे काही पर्यटकस्नेही होते. शिवाय भारतासारखेच डाव्या बाजूने चालणारे ट्राफिक. त्यामुळे वेगळी व्यवस्था अंगवळणी पडून घ्यायचे कष्टही नाहीत. इंडोनेशिया तसा गरीब देश असूनही इथली स्वच्छता, नीटनेटकेपणा, आणि मुख्य म्हणजे सौन्दर्यदृष्टी कौतुकास्पद होती. मधे थोडा वेळ कॉफीसाठी थांबून मी साधारण दुपारी बाराच्या सुमारास उलून दानू ला पोहोचलो. 

रस्त्यावर दिसणारी भातशेती 

तळकोकणासारखे भूदृश्य 


उलून दानू म्हणजे बाली मधले एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ. बेरातान सरोवराच्या काठाशी असलेल्या या मंदिराने देशोदेशीच्या पर्यटकांना भुरळ घातली आहे. किंबहुना हे मंदिर म्हणजे बालीची ओळख बनून राहिले आहे. सतराव्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर पाण्याची देवता दानू हिच्यासाठी बांधले गेले आहे. इथे काही बौद्ध आणि हिंदू देवतांची पूजास्थाने आहेत. दुपारची वेळ असल्याने मंदिरात विशेष गर्दी नव्हती. मंदिराचा प्रशस्त परिसर उठून दिसत होता. इथेही मंदिराच्या आतल्या भागात जायला परवानगी नव्हतीच. आजूबाजूचा सगळा परिसर सुंदर फुलझाडांनी सुशोभित केलेला होता. तेवढ्यात दृष्टीस पडले ते मंदिराचे मुख्य आकर्षण – पाण्याच्या मधोमध असलेले उतरत्या छपरांचे दोन मनोरे. हे दोन मनोरे सरोवराच्या आत असलेल्या एक लहानशा बेटावर उभारले आहेत. बेटाचा पृष्ठभाग अगदी सपाट असल्याने हे मनोरे अक्षरशः पाण्यात तरंगत असल्यासारखे वाटतात. हे मनोरे शिव आणि पार्वती यांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते. समोरचे निळेशार सरोवर, त्यात उमटणार्‍या संथ लाटा, त्यामागच्या डोंगररांगा, आणि पाण्याच्या मधोमध असलेले दोन पवित्र मनोरे असा तो सगळा परिसर विलक्षण सुंदर दिसत होता. हवा आल्हाददायक होती. ऊन स्वच्छ होते. ढगांचे काही पुंजके समोरच्या डोंगरांना बिलगले होते. एखाद्या अद्भुतरम्य विश्वात आल्यासारखे वाटत होते. निसर्गसौन्दर्य आणि अध्यात्म यांची उत्तम सांगड घातलेली दिसत होती. थोडा वेळ तिथे आजूबाजूला फिरत राहिलो. असंख्य फोटो काढले. तिथून निघावेसेच वाटत नव्हते. पण पुढचा लांबचा पल्ला गाठायचा होता. शेवटी कॅमेरा बंद केला आणि तिथून बाहेर पडलो. 

तरंगते मनोरे आणि रम्य सरोवर 

उलून दानू चा रम्य परिसर 

निळेशार सरोवर, मागचे डोंगर, आणि त्यावर तरंगणारे ढगांचे पुंजके 

बेरातान सरोवरचा रम्य परिसर 

सेकेंपूल धबधब्याचं लोकेशन टाकलं आणि स्कूटर चालू केली. धबधबा बघून पुढे किंतामानीला पोहोचायचं होतं. मी थोडा वेग वाढवला. उलून दानू चे विशाल सरोवर मागे पडले आणि रस्ता थेट पाठीमागच्या डोंगरात शिरला. मस्त नागमोडी वळणांचा घाट सुरू झाला. रस्ता सुरेख तर होताच. पण आता आजूबाजूला हिरव्यागार झाडांची सोबत होती. भर पावसाळ्यात खंडाळ्याच्या घाटातून जावे तसे वाटत होते. हळूहळू लोकवस्ती विरळ होत चालली होती. जंगल घनदाट होत होते. सेकेंपूलकडे जाणारा हा मुख्य रस्ता नसावा कदाचित. कारण पर्यटकांच्या फारशा गाड्याही दिसत नव्हत्या. तेवढ्यात रस्त्यावर पाटी दिसली तिरता बुआना धबधबा. पाटीवरचे चित्र तर छानच दिसत होते. बघूया तरी काय आहे, असं म्हणून मी स्कूटर वळवली. थोडे अंतर आत जातोच तर एक चेक पोस्ट दिसले. तिथे काही स्थानिक तरुणांनी अडवले. सांगू लागले धबधब्याला जायचे असेल तर इथे एंट्री करा. मी गुमान थांबून एंट्री करू लागलो. मग तिथला एक जण सांगू लागला की पुढे जायला गाईड सोबत घेणे बंधनकारक आहे आणि ही सरकारी व्यवस्था आहे. मी पहिलं तर त्या कागदावर कुठेही सरकारी लोगो नव्हता. ना त्या तरूणांकडे कुठले ओळखपत्र होते. मला सगळं प्रकार संशयास्पद वाटू लागला. बाली मध्ये घडणार्‍या अशा फसवणुकीच्या प्रकाराविषयी मी आधी इंटरनेट वर वाचलं होतं. हा तसलाच काहीतरी प्रकार दिसतोय हे लक्षात येताच मी सरळ गाईड नको असे सांगून तिथून निघालो. मी निघतोय हे बघून तिथले तरुण म्हणायला लागले पुढे जाता येणार नाही, दंड भरावा लागेल, वगैरे. पण माझ्या समोरच दोन गाड्या यांच्या चेक पोस्ट ला न जुमानता सरळ पुढे निघून गेल्या. ते बघून मी सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करून धबधब्याच्या दिशेने निघालो. नशीब लवकर सगळं लक्षात आलं. नाहीतर लुटलोच जाणार होतो. 

धबधब्याजवळची गर्द झाडी  

दरीत कोसळणारा धबधबा 

लयीत कोसळणारे पाणी आणि समोरचे कुंड 



मुख्य रस्त्यावरून थोडा बाजूला असलेला एक तीव्र उतार पार करून मी धबधब्याजवळ पोहोचलो. ही तर फक्त पार्किंगची जागा होती. धबधबा आणखी पुढे दरीत होता. इथे तर एकही गाडी दिसत नव्हती. आपण नक्की योग्य जागी आलोय की नाही आही शंका येऊ लागली. तेवढ्यात एक जोडपं दरीतून वर येताना दिसलं. त्यांनी सांगितलं की धबधबा साधारण दहा मिनिटांवर आहे. मग मी लगेचच खाली उतरू लागलो. दूरवरून पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. गर्द झाडीतून एक वळण घेतले आणि समोर पाहतो तर काय, दुधासारखे शुभ्र पाणी हिरव्यागार वनराईतून खालच्या कुंडात झेपावत होते. त्या ध्रोंकाराने सगळा आसमंत भरून राहिला होता. मुख्य म्हणजे तिथे कुणीच पर्यटक नव्हते. नुसता धबधबा आणि मी! हर्षोल्हासित होऊन मी पाण्याकडे धाव घेतली. धबधब्याच्या एका बाजूला बंधारा बांधून एक लहानसे कुंड तयार केले होते. जणू काही निसर्गाच्या कुशीतला स्विमिंग पूल! आता मात्र माला मोह आवरला नाही. बॅग एका बाजूला ठेवली, कपडे काढले, आणि सरळ कुंडात उतरलो. अहाहा काय थंडगार पाणी होतं! दिवसभरच्या स्कूटरचालनाचा शीण एका क्षणात नष्ट झाला. पाणी जेमतेम चार फूट खोल होतं. पुढे खोली जास्त असावी कदाचित. पण पोहता येत नसल्याने पुढे जायचा विचार सुद्धा केला नाही. नुसता गारेगार पाण्यात डुंबत समोरचा धबधबा आणि आजूबाजूचे रान न्याहाळत राहिलो. निसर्गाच्या सहवासातला तो एकांत म्हणजे एखाद्या थेरपी सारखा वाटत होता. किती वेळ गेला असेल कुणास ठाऊक. पाण्यात खेळून एकदम भुकेची जाणीव झाली तेव्हा भानावर आलो. बघतो तर अडीच वाजले होते. अजून सेकंपूल धबधबा बघायचा होता. शिवाय अंधार पडायच्या आत किंतामानी गाठायचे होते. लगेच पाण्याबाहेर पडलो आणि आवरून तिथून निघालो. 

कुंडात डुंबणे हा एक स्वर्गीय अनुभव होता 

तिथून पुढचा रस्ता म्हणजे निसर्गसौंदर्याची खाणच होती. हिरव्या रानाने गच्च भरलेले डोंगर, त्यांच्या माथ्यावर भुरभुरणारे ढग, आणि त्यातून चिरत जाणारा कुळकुळीत डांबररस्ता! मध्ये फोटो काढायला थांबायचा फार मोह होत होता. पण उशीर होईल म्हणून मोह आवरला आणि स्कूटर सरळ पुढे दामटवली. असंख्य वळणे पार करत शेवटी सेकेंपूल धबधब्याजवळ पोहोचलो. ही तशी प्रसिद्ध जागा होती. इथला परिसर बराच मोठा होता. इथे सरकारी नियोजन दिसत होते. गाडी पार्क केली आणि तिकीट काढायला गेलो. तिथली माहिती वाचून लक्षात आलं की हा धबधबा व्यवस्थित बघायचा असेल तर एक संपूर्ण दिवस हवा. साधारण सात तासांचा गाइडेड ट्रेक केला तर आजूबाजूच्या रानातून धबधब्याचे सगळे कंगोरे बघत फिरता येतं. आणि शेवटी एका कुंडात पोहता पण येतं. अर्थातच माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. आणि मनसोक्त कुंडात डुंबून आधीच झालं होतं. मग मी नुसता धबधबा लांबून बघता येईल अशा जागेपर्यंत जायचं तिकीट काढलं आणि निघालो. तिथे जायलाही अर्ध्या तासाची पायपीट होती. चालायला जिवावर आलं होतं. पण आता आलोच आहे इथवर तर निदान धबधब्याचं दर्शन तरी घेऊ असं म्हणून मी निघालो. पक्की बांधलेली ते पायवाट गर्द रानातून हळूहळू दरीत उतरत होती. वीसच मिनिटात एका व्यु पॉइंट वर पोहोचलो. आणि समोरचं दृश्य अचंबित करणारं होतं. एका प्रचंड डोंगराच्या खोबणीतून दोन शुभ्र धारा आवेगात खाली कोसळत होत्या. शिवाय अनेक उपाधारा इकडेतिकडे बागडत होत्या. पलीकडच्या डोंगरावरून आणखी एक प्रवाह खाली दरीत झेपावत होता. आजूबाजूच्या गच्च झाडीतून हिरवा रंग ओसंडून वाहत होता. ढगांच्या फटीतून वाट काढत उन्हाची एक तिरीप त्या प्रवाहांवर स्थिरावली होती. जणू काही डोंगराच्या रंगमंचावर एखादा एकपात्री प्रयोग सुरू होता आणि सूर्यनारायण त्याची प्रकाशयोजना हाताळत होता. सारेच अद्भुत होते. तिथूनच सात तासांच्या ट्रेकची वाट खाली उतरत होती. धबधब्याच्या पार खालच्या टोकाकडे जाऊन त्याच्या उंचीचा आणि सामर्थ्याचा वेध घेणे किती रोमांचक असेल याची कल्पना मी तिथे उभा राहून करत होतो. खाली जाता येणार नाही याची काहीशी हळहळही वाटत होती. मग तिथूनच भरपूर फोटो काढले आणि माघारी वळलो.


सेकेंपूल धबधब्याचा रम्य परिसर 

दरीत कोसळणारे दोन शुभ्र प्रवाह 

प्रवाहावर रेंगाळणारी उन्हाची तिरीप 


चार वाजत आले होते आणि मला जेवायची सुद्धा संधी मिळाली नव्हती. चांगलीच भूक लागली होती. मग तिकीट खिडकीच्या बाजूच्या एका लहानशा उपहारगृहात शिरलो आणि फ्राइड राईस मागवला. दोन घास घशाखाली गेल्यावर जरा बरं वाटलं. जेवण आटोपून पुन्हा स्कूटर चालू केली आणि किंतामानीकडे निघालो.

क्रमशः 

नयनरम्य बाली – भाग ७ – बालीतील मंदिरांचे स्थापत्यसौंदर्य Beautiful Bali – Part 7 – Architectural beauty of Balinese temples

रिज  वॉक आणि राइस टेरेस यांनी माझ्या ऊबुदच्या स्थलदर्शनाची सुरुवात झाली होती. पैकी राइस टेरेसने काहीसा अपेक्षाभंगच केला होता. आता आसपासची काही मंदिरे बघायची होती. एव्हाना दुपारचा एक वाजत आला होता. चांगलीच भूक लागली होती. वाटेत कुठेतरी थांबू असा विचार करत हळू हळू स्कूटर चालवत होतो. एवढ्यात एक भलेमोठे भाताचे शेत दृष्टीस पडले. इथे काही उतारावरची खाचा पाडलेली जमीन नव्हती. पण तरीही सर्वदूर पसरलेला पोपटी रंग फारच आल्हाददायक वाटत होता. फोटो काढूया असं म्हणून मी स्कूटर जरा बाजूला घेतली. तेवढ्यात बाजूच्या उपहारगृहातली तरुणी आत चला असा आग्रह करत बाहेर आली. एकंदरीत बरं दिसत होतं हॉटेल. मग मी थेट आत शिरलो. भाताचे शेत दिसेल अशी मोक्याची जागा निवडली आणि निवांत बसलो. दुर्भाग्याने इथल्या मेनूकार्डवर फार काही शाकाहारी पदार्थ नव्हते. मग तिथल्या वेटरलाच विचारलं, लगेच काय मिळेल. गाडो-गाडो हा इंडोनेशियन पदार्थ जवळपास तयारच होता. हा पदार्थ म्हणजे मोड आलेली कडधान्ये, तोफू, सलाडची पाने, आणि उकडलेल्या भाजांचे मिश्रण असते. इंडोनेशियन शाकाहारी जेवणात हा पदार्थ लोकप्रिय आहे. समोरचे हिरवेगार शेत बघत बघत जेवण केले आणि पुढच्या जागेचा रस्ता नकाशावर शोधू लागलो.  

हिरवीगार भातशेती 

गाडो-गाडो 

आता वेळ आली होती मंदिरदर्शनाची. बाली जितकं समुद्रकिनार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे तितकंच इथल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. इथली मंदिरे भारतातल्या मंदिरांपेक्षा एकदम वेगळी असतात. मंडप, गाभारा, कळस, मूर्ती असं काहीच त्यांत नसतं. असते ते एक मोठे प्रांगण. हे प्रांगण तीन भागांत विभागलेले असते, ज्यांना मंडल म्हणतात. त्यांपैकी बाहेरचा भाग म्हणजे निष्टा मंडल किंवा जाबा. हा भाग कमी पवित्र मानला जातो. या भागात बाले कुलकुल म्हटले जाणारे ढोल लटकवलेले मनोरे असतात. हा ढोल वाजवून गावकर्‍यांना घोषणा करण्यासाठी एकत्र बोलावले जाते. या भागाचे प्रवेशद्वार हे कमान असलेले असते आणि बाहेर दोन द्वारपाल असतात. त्यापुढे असते मद्य मंडल किंवा जाबा तेंगाह. या भागाचे प्रवेशद्वार विभाजित असते आणि त्यावर कमान नसते. याला कांडी बेंतार असे म्हटले जाते. बालीमध्ये सर्वत्र दिसणारा हा स्थापत्यघटक म्हणजे दुभंगलेला मेरू पर्वत आहे. स्थानिक पुराणानुसार शंकराने मेरू पर्वत भारतातून बालीमध्ये आणला आणि दोन भागांत विभागला. हे दोन भाग सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात कायम संतुलन असावे असा संदेश देतात. मद्य मंडलात काही ढोल असलेले मनोरे तर काही मंडप असतात. सगळ्यात आतमध्ये असते उतमा मंडल किंवा जेरोअन. हे सगळ्यात पवित्र मंडल समजले जाते. यात पूर्वजांचे प्रतिनिधित्व करणारे मनोरे असतात. मंदिरात सर्वत्र आढळणारा स्थापत्यघटक म्हणजे पद्मासन. बहुतेक सगळ्या हिंदू देवता इथल्या धर्मात पूजनीय असल्या तरी हा धर्म एकेश्वरवादी आहे. यांचा ईश्वर, ज्याला सांग हयांग विधी वासा म्हटले जाते, तो निर्गुण व निराकार आहे. त्याला कोणत्याही मूर्तीतून व्यक्त करता येत नाही. म्हणून दगडातून घडवलेले एक आसन, ज्याला पद्मासन म्हणतात, सर्वत्र उभारले जाते. असे मानले जाते की प्रार्थनेच्या वेळी विधी वासा या आसनावर अवतरतो व स्थानापन्न होतो. सोळाव्या शतकातील एक धर्मगुरू दांग हयांग निरर्था यांनी मांडलेल्या तत्वज्ञानावर ही मंदिर रचना आधारित आहे. एकंदरीत भारतातील हिंदू घटकांचा प्रभाव असलेली पण स्थानिक श्रद्धास्थानांचा अंतर्भाव करणारी इथली मंदिररचना फारच इंट्रेस्टिंग आहे.

माझ्या रूपरेषेतले पहिले मंदिर होते गुनुंग कावी सेबतू. हे मंदिर एका लहानशा टेकडीच्या बाजूला होते. फारसे प्रसिद्ध नसल्याने इथे गर्दी नव्हती. सगळा परिसर अतिशय रम्य वाटत होता. सारोंग गुंडाळून मी आत गेलो. एका बाजूला एका तळ्याच्या मध्यात वीणावादन करणार्‍या सरस्वतीची शुभ्र पांढरी मूर्ती होती. मूर्तीची प्रमाणबद्धता, अलंकार, चेहर्‍यावरचे पवित्र भाव, सारेच अद्भुत होते. त्या रम्य वातावरणात ती सुंदर मूर्ती इतकी लोभस वाटत होती की मी तिथेच बराच वेळ फोटो काढत बसलो. मग मंदिराचे इतर काही भाग बघितले. दुसर्‍या टोकाला अजून एक तळे होते. त्याच्या काठाशी सजवलेले पद्मासन होते. मागे असलेल्या हिरव्यागार झाडीच्या पार्श्वभूमीवर ते पद्मासन फारच विलोभनीय वाटत होते. मंदिराच्या उतमा मंडलात पर्यटकांना प्रवेश नव्हता. मग मी तिथे थोडेफार अजून फोटो काढून पुढच्या मंदिराकडे वळलो.

तळ्याच्या मध्यात असलेली सरस्वतीची मूर्ती 

मंदिरातील कुंड 

मंदिराचा रम्य परिसर 

पद्मासन 

सरस्वतीच्या चेहऱ्यावरचे भाव 

पुढचे मंदिर होते पुरा तीर्था एमपुल. Holy Spring Water Temple या नावाने हे मंदिर पर्यटकांत प्रसिद्ध आहे. अपेक्षेप्रमाणे इथे बर्‍यापैकी गर्दी होती. जवळच्या एका झर्‍याचे पाणी इथे एका कुंडातून सदासर्वकाळ वाहत असते. त्याखाली आंघोळ करून मग आत प्रार्थनेसाठी जायचे असा रिवाज आहे. बघतो तर कुंडात आंघोळ करायला ही मोठी रांग. शिवाय स्वतःच्या वस्तू ठेवायला लॉकरची वेगळी रक्कम. मी तो विचार सोडून दिला आणि सारोंग गुंडाळून थेट मंदिरात शिरलो. हे मंदिर तसे प्रशस्त होते. पाण्याचे कुंड अपेक्षेपेक्षा फारच स्वछ दिसत होते. लोकही शिस्तीत उभे होते. काश भारतात कधी असे चित्र बघायला मिळेल. मंदिरातले एक द्वार फारच सुंदररित्या सुशोभित केले होते. इथे सेलफी काढायला लोकांची रांग लागली होती. उतमा मंडलात प्रवेश नव्हताच. पण आतमध्ये पारंपरिक पोषाखातील काही स्थानिक लोक प्रार्थना करत होते. एक पुजारी त्यांना संबोधित करत होता. उदबत्त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. प्रत्येकाने आपापले कनांग सारी पूजेकरता आणले होते. कुठलाही गोंगाट नाही, घंटांचा खणखणाट नाही, ढकलाढकली नाही. केवळ शांतपणे केली जाणारी प्रार्थना. त्यांचे विधी आणि रिवाज बघत मी थोडा वेळ थांबलो. फार छान वाटलं.  

कुंडात आंघोळ करणारे पर्यटक 

जवळचे दुसरे कुंड 

प्रार्थना करणारे स्थानिक लोक 

पुढचं मंदिर होतं पुरा गुनुंग कावी. हे मंदिर अकराव्या शतकात बांधलेल्या छेदाष्म थडग्यांसाठी प्रसिद्ध आहे. उदयान साम्राज्यातील राजा अनक वांगसु याच्या राण्या आणि संतती यांच्यासाठी असलेली ही थडगी पेरकसान नदीच्या दोन बाजूंनी असलेल्या डोंगरांत कोरलेली आहेत. मंदिराच्या बाहेर स्कूटर लावली तेव्हा ढग दाटून आले होते. मंदिर नदीच्या खोर्‍यात होते. बर्‍याच पायर्‍या खाली उतरून जायचे होते. मी खाली उतरु लागलो आणि तेवढ्यात बारीक पावसाला सुरुवात झाली. पायर्‍या संपल्या आणि समोर एक भाताचे शेत दिसू लागले. दाटून आलेले ढग, भुभुरणारा पाऊस, लांबून येणारा नदीच्या प्रवाहाचा आवाज, हिरवीगार भातशेती, सारेच विलोभनीय होते. तिथून पुढे अजून काही पायर्‍या उतरून थडग्यांच्या परिसरात पोहोचलो. उंच ताशीव कड्यांमध्ये गुहा कोरून त्यात मंदिराच्या कळसासारखी शिल्पे कोरली होती. ते बघून मला अजिंठा-वेरूळची लेणी आठवली. किंबहुना जॉर्डन मधील पेट्रा येथील थडगी या थडग्यांशी अधिक मिळतीजुळती होती. समोर नदीचा प्रवाह खळाळत होता. काठाने उंच आणि दाट झाडं होती. एखाद्या घनदाट अरण्यात यावं आणि समोर एखाद्या पुरातन स्मारकाचे अवशेष सापडावेत तसं वाटत होतं. तिथे थोडेफार फोटो काढले आणि मागे वळलो.

दरीतली भातशेती 

दाट झाडीतून वाहणारी नदी आणि मागची मंदिरे 

छेदाष्म थडगी 

पावसाळी वातावरणात तिथे गूढ वाटत होते 

हिरवीगार दरी 

आता आजचे शेवटचे मंदिर होते गोवा गजह मंदिर. उघडं तोंड असलेल्या आकाराच्या गुहेसाठी हे मंदिर पर्यटकांत प्रसिद्ध आहे. मंदिराचा परिसर बराच मोठा होता. तिकीट काढून आणि सारोंग गुंडाळून मी आत शिरलो. डाव्या हाताला गुहा होती. फोटोत दिसते त्यापेक्षा ही गुहा लहानच होती. वाकून मी आत शिरलो. उदबत्त्यांचा धूर पसरला होता. आतली उष्णता, आर्द्रता, आणि धूर यांमुळे घुसमटायला होत होतं. गुहेत एका बाजूला गणपतीची मूर्ती होती तर एका बाजूला शिवलिंग होते. आत काही फार वेळ थांबता येत नव्हतं. मी लगेचच बाहेर आलो. बाहेरचे मंदिर काहीसे इतर मंदिरांसारखेच होते. वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे आणि पद्मासन दिसत होते. इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भलेमोठे पाण्याचे कुंड. यात सात देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी अशा भारतातल्या सात नद्यांचे प्रतिनिधित्व करतात. पलीकडे एक वाट एका दरीत उतरताना दिसत होती. तिथे काही बौद्ध स्तूप आणि लहान मंदिरे होती. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून मी बाहेर पडलो.

आज दिवसभर चांगलीच तंगडतोड झाली होती. त्यामुळे आता जीव थकला होता. मी लगेच होमस्टेवर परतलो. एव्हाना सात वाजलेच होते. थोडा वेळ विश्रांती घेऊन जेवायला बाहेर पडलो. ऊबुद मधला मुख्य बाजार रस्ता हाकेच्या अंतरावर होता. तिथे थोडा वेळ फेरफटका मारून मोक्षा कॅफे नावच्या प्रसिद्ध उपहारगृहात जेवायला गेलो. आतला अॅम्बियन्स छानच होता. बसायला बैठक आणि चौरंगासारखे टेबल होते. मुख्य म्हणजे हे उपहारगृह संपूर्ण वीगन होते. भारताबाहेर अशी जागा सापडणे आधीच मुश्किल. इथे तर स्थानिक आणि पाश्चात्त्य अशा वेगवेगळ्या संपूर्ण शाकाहारी पदार्थांची रेलचेल होती. मग त्यातला बालीनीज करी हा पदार्थ मागवला. ही करी तशी थाई करीसारखीच होती. पण मसाले काहीसे वेगळे होते. मनसोक्त जेवून मग मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. उद्या चेक आऊट करायचे होते. मग सामान बांधून ठेवून झोपी गेलो.

गोवा गजह मंदिरातील कुंड आणि नद्यांच्या मूर्ती 

मंदिरातील प्रसिद्ध गुहा 

गुहेतील गणपतीची मूर्ती 

गुहेतील शिवलिंगे 

दरीत उतरणारी वाट 

क्रमशः