तांबडी सुर्ला ट्रेक - भाग २ - धबधबा आणि महादेव मंदिर

आता चढ सुरु झाला. सकाळी हवाहवासा वाटणारा ओलसर गारवा आता नकोशा दमट उष्म्यात बदलला होता. चार पावलांवर दम लागत होता. चढण फार तीव्र नव्हती. आजूबाजूची गर्द वनराई ती चढण जरा सुसह्य करत होती. आधीच ढगाळ हवा, त्यात उंच झाडांचा विस्तारलेला पर्णसंभार. त्यामुळे रानात अगदीच अंधारलेले होते. सह्याद्रीतल्या अंधारबन ट्रेकची आठवण होत होती. थोड्या वेळातच प्रचंड पाण्याचा घुमणारा आवाज कानावर येऊ लागला. धबधब्याच्या जवळ पोहोचल्याची ती खूण होती. उजवीकडच्या दरी झाडांच्या गर्दीतून वेगाने वाहणारे पाणी अधेमध्ये दृष्टीस पडत होते. आता मात्र कधी एकदा धबधब्याचे दर्शन होतेय असे झाले होते. एक वळण पार केले आणि अचानक दोन झाडांच्या मधून एक फेसाळता पांढरा पडदा दृष्टीस पडला. क्षणभर कळेचना हे पाणी आहे की ढग आहेत! थोडे अजून वर चढलो आणि त्या अखंड जलप्रपाताचे दर्शन झाले. गर्द वनराई नेसलेल्या त्या उंच पहाडावरून पाणी घोंघावत खाली कोसळत होते. पडता पडता त्याच्या अनेक शाखा-उपशाखा बनत होत्या. कातळ-कपाऱ्यांत खेळून त्या पुन्हा मुख्य प्रवाहास बिलगत होत्या. पाण्याचे ते रूप पाहून मी क्षणभर स्तब्धच झालो. सारा थकवा क्षणार्धात दूर झाला. थोडा वेळ ते सारे दृश्य नजरेत सामावून मी कॅमेरा बाहेर काढला. त्या जागेवरून फोटो फेसबुक डीपी काढण्यात आम्ही सारेच मग्न झालो. डाव्या बाजूने एक वाट थोडी खाली उतरत धबधब्याच्या दिशेने जात होती. प्रवाहाच्या थोडं जवळ जाता यावं म्हणून तिथून खाली उतरलो. 

गर्द झाडीतून दिसणारा तांबडी सुर्ला धबधबा 

ती जागा एखाद्या कुंडासारखी होती. तिन्ही बाजूंनी डोंगर होते. समोरच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा उजवीकडे दरीत झेपावत होता. इथून पाण्याचा प्रवाह अगदी ढेंगभर अंतरावर होता. बाजूला एक लहानसे डबकेसुद्धा तयार झाले होते. जणू निसर्गाने आमची पाण्यात डुंबायची सोयच करून ठेवली होती. पण पाण्याचा प्रवाह खूपच जास्त होता. शिवाय वाटही निसरडी झाली होती. एक घसरलेले पाउल म्हणजे कपाळमोक्षच! त्यामुळे आम्ही फार पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या दगडावर बसल्या-बसल्या तो धबधबा अनुभवणे म्हणजे अक्षरशः शब्दातीत होते. मुख्य म्हणजे त्या जागी आम्ही सहा जण वगळता बाकी कोणीच नव्हते! मुंबईजवळच्या प्रसिद्ध धबधब्यांजवळ दिसणारी गर्दी आणि गोंगाट इथे नव्हते. अशा शांततेत निसर्ग अनुभवणे आजकाल अप्राप्यच झाले आहे. ती शांतता उपभोगण्यासाठी मी त्या दगडावरच काही मिनिटे ध्यानस्थ झालो. समर्थ रामदासांनी शिवथर घळीचे वर्णन करताना लिहलेल्या ओळी मनात घुमत होत्या - गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे | धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे || प्रत्येक श्वासागणिक त्या धबधब आवाजाचा ताल मी अनुभवत होतो. तेवढ्यात बारीक पाऊस सुरु झाला. धबधब्याचे उडणारे तुषार भिजवत होतेच. आता पाउसही त्यात सामील झाला. पावसाबरोबर आलेल्या गार हवेच्या झोताने आता हुडहुडी भरू लागली. जेमतेम अर्ध्या तासापूर्वी दमट हवेत घामाघूम झालेले आम्ही आता त्या प्रपाताच्या शेजारी कुडकुडत उभे होतो. निसर्गाची किमया म्हणजे अजबच! इथे कॅमेरा काढायला मात्र काही वाव नव्हता. मनसोक्त धबधबा अनुभवून आम्ही तिथून निघालो.


येतानाची उताराची वाट अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. खालच्या ओढ्याजवळ फोटो काढायला थोडा वेळ थांबलो. पावसाने भिजवले होतेच. त्यामुळे आता ओढ्यात डुंबायची इच्छा होत नव्हती. शिवाय मंदिरातही जायचे होते. लवकरच आम्ही मंदिराबाहेरच्या दुकानांजवळ पोहोचलो. मंदिराचा परिसर भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केला आहे. मंदिरात तुरळक गर्दी होती. प्रवेशद्वारातून आत शिरलो आणि समोरच काळ्या बेसाल्ट पाषाणामध्ये घडवलेले सुबक मंदिर नजरेस पडले. आजूबाजूच्या गर्द हिरव्या रानाच्या पार्श्वभूमीवर ते काळ्या पाषाणातले मंदिर फारच उठून दिसत होते. हे मंदिर बाराव्या शतकात कदंब राजवटीत बांधले गेले. मंदिरासाठी वापरला गेलेला दगड हा त्या परिसरात सापडणाऱ्या लाल खडकाशी मिळता-जुळता नाही. त्यामुळे तो घाटमाथ्यावरून आणला गेला असावा असा कयास आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराची शैली कर्नाटकातील ऐहोळे येथील मंदिरांवर बेतलेली असून कळस अर्धवट बांधलेला आहे. या शैलीतले गोव्यातले हे एकमेव मंदिर आहे. घनदाट रानात बांधलेले असल्याने हे मंदिर परकीय आक्रमणांपासून सुरक्षित राहिले. मंदिरातले शिवलिंग अजूनही पूजेत आहे. 


तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर 

आम्ही बूट काढून आत शिरलो. मंदिराच्या पायऱ्या चढताना पायांवर ट्रेकचा परिणाम जाणवत होता. गोव्यातल्या इतर मंदिरांपेक्षा हे तसे लहानसेच होते. मात्र त्यावरची कोरीवकला फारच सुरेख होती. मंडपातले स्तंभ साधेच होते; मात्र भौमितिक आकारांनी त्यांचे साधेपण खुलून दिसत होते. छतावारचे पानाफुलांचे कोरीवकाम फारच सुरेख होते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहाच्या बाहेर असलेले नागांचे शिल्प. साधारण दीड फूट उंचीचे, नागांचे शिल्प कोरलेले दोन आयताकृती दगड गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन बाजूंना ठेवलेले होते. जणू देवाचे द्वारपाल. आतमध्ये शिवलिंगासमोर निरांजन तेवत होते. दोन-चार फुले वाहलेली दिसत होती. त्या निरांजनाच्या मंद प्रकाशात ते गर्भगृह काहीसे गूढ मात्र तरीही प्रसन्न वाटत होते. दर्शनानंतर आम्ही मंदिराबाहेर पडलो. मंदिराच्या बाहेरील भिंतींवरचे कोरीवकाम अजूनच सुंदर होते. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. 


छतावरील सुरेख कोरीवकाम  

द्वारपालांसदृश वाटणारी नागशिल्पे  

रिसॉर्टवर परत आलो तेव्हा सुग्रास भोजन स्वागताला हजर होतेच. आम्ही लगेचच आवरून जेवणावर ताव मारला. जेवता-जेवता सहज माझं पायाकडे लक्ष गेलं आणि पाहतो तर काय, पायावर रक्ताचे ओघळ! ना काही वेदना ना काही जळजळ. हे म्हणजे हमखास जळूचे काम. पश्चिम घाटातली जंगले म्हटली की जळवा आल्याच. आता या ट्रेकमध्ये कोणत्या जागी जळू माझ्यावर पायावर चढली देव जाणे! तिच्या चाव्याने वाहू लागलेलं रक्त काही थांबत नव्हतं. जळवेच्या लाळेत हिपॅरीन नामक पदार्थ असतो जो रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबवतो. मी दर दहा मिनिटाला रक्त पुसत होतो. शेवटी दोनेक तासांनी रक्त वहायचे थांबले. आश्चर्य म्हणजे केवळ मलाच हा जळवांचा अनुभव आला होता. असो. रिसॉर्टच्या मागच्या बाजूने एक नदी वाहत होती. परतीच्या प्रवासाला अजून वेळ होता. नदीकाठी थोडा वेळ घालवला आणि चहापान करून सामान आवरायला घेतले.  

ट्रेकमध्ये जमलेला धमाल ग्रुप 

पाचच्या सुमारास आम्ही रिसॉर्टवरून निघालो. कुळें स्टेशनवरून मडगाव आणि तिथून मत्स्यगंधा एक्स्प्रेसने मुंबई असा बेत होता. ट्रेक संपल्याची हुरहूर मनात होती. पण गोव्यातले एक फारसे परिचित नसलेले ठिकाण अनुभवल्याचे समाधान मनात होते.                       

तांबडी सुर्ला ट्रेक - भाग १ - घनदाट अरण्यातली पाऊलवाट

गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात नयनरम्य समुद्रकिनारे, देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी, सळसळतं नाईटलाईफ, आणि एकूणच मस्तीभरा माहोल! पण याच गोव्याची फारशी परिचित नसलेली एक बाजूही आहे. ती म्हणजे पश्चिम घाटातले धबधबे, पुरातन मंदिरे, आणि वन्यजीवन. गेल्या काही वर्षांत चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातल्या दृश्यामुळे दूधसागर धबधबा नको तितक्या प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पण त्याच्याच आजूबाजूचे इतर धबधबे मात्र अजूनही त्यांचे रांगडेपण जपून आहेत. असाच एक धबधबा म्हणजे तांबडी सुर्ला. तिथलं घनदाट अरण्य, गर्द वृक्षराजीत लपलेला धबधबा, आणि पायथ्याचं प्राचीन शिवमंदिर याविषयी ट्रेकिंग समुदायाकडून बरेच काही ऐकून होतो. बरेच दिवस ती जागा to-do list वर होती. यंदाच्या पावसाळ्यातले ट्रेक ठरवताना अचानक एका परिचित ग्रुपच्या शेड्युलवर तांबडी सुर्ला ट्रेक दिसला. वेळेचं गणित जुळून येतंय असं दिसताच ट्रेक बुक करून टाकला. 

तांबडी सुर्ला ट्रेक फोटो कोलाज 

ठरलेल्या वेळेप्रमाणे पुणे स्टेशनवर ग्रुप लीडर आणि इतर मेम्बर्सना भेटलो. शनिवारी साधारण साडेचारच्या सुमारास आमचा गोवा एक्सप्रेस ने प्रवास सुरु झाला. वाटेतल्या हरएक स्टेशनात थांबत डुगडुगत जाणारी ती गाडी गोव्याला पोहोचायला तब्बल १२ तास घेते! पण थेट कुळें स्टेशन गाठायचे असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. असो. गाडीत दूधसागरला जाणारा तब्बल ६० जणांचा ग्रुप होता. आणि तांबडी सुर्लाला जाणारे आम्ही फक्त पाच! अश्विनी, अपर्णा, प्रिया, आणि स्मिता अशा मुंबईच्या चार मैत्रिणी एकत्र आल्या होत्या. ट्रेक लीडर म्हणून पुण्याचा हरपाल होता. सगळ्या ग्रुपसोबत लगेचच मैत्री झाली आणि गप्पांचा फड रंगला. मग ट्रेकिंग मधले किस्से, भुता-खेताच्या गोष्टी, आणि काय नि काय. ट्रेनमधल्या गप्पांना विषयांचा कधी अंतच नसतो. कुळें स्टेशन पहाटे साडेचारला येणार होतं. साडेदहाच्या आसपास गप्पा आणि जेवण आवरून आम्ही झोपायच्या तयारीला लागलो. पण एकतर स्लीपर क्लास, त्यात सगळ्या कुडमुड्या स्टेशनांवर थांबणारी गाडी, आणि दूधसागर वाला ६० जणांचा ग्रुप, यांमुळे आज झोप काही नशिबात नाही हे लवकरच कळून चुकले! जरा वेळ डोळा लागतोय तर कुठले तरी स्टेशन हजर! त्यात दूधसागर ट्रेकला जाणाऱ्यांना पहाटे साडेतीनच्या सुमारास धबधब्याजवळच्या कुठल्याशा अडनिड्या स्टेशनावर उतरायचे होते. त्यामुळे त्यांची तर दोन वाजल्यापासूनच खुडबुड सुरु झाली होती. 

तांबडी सुर्ला मंदिराचे स्थान 

गाडी तासभर उशिराने धावत होती. पहाटे पाचच्या सुमारास अर्धवट झोपेतच आम्ही कुळें स्टेशनवर उतरलो. जवळच्याच एका जंगल रिसॉर्टवर एका दिवसाची राहण्या-जेवण्याची सोय केलेली होती. दहा मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो. सात वाजता नाश्ता वगैरे करून ट्रेकला निघायचे असे ठरवून आम्ही आन्हिकं उरकायला रूमवर गेलो. रूममधला पलंग पाहून वाटलं जरा वेळ डुलकी काढूया. तसाही चार मुलींना आवरायला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. असे म्हणून मी आणि हरपाल जरा पहुडलो. रात्रभर अर्धवट झोप झाल्याने पटकन डोळा लागला. दारावरची थाप ऐकून खडबडून जाग आली आणि घड्याळात पाहतो तर काय, सव्वासात!! या चौघी जणी सगळं आवरून-सावरून घुश्शातच बाहेर उभ्या होत्या. त्यात नाश्त्याची तर ऑर्डरपण दिलेली नव्हती. बाहेर ड्रायव्हर ताटकळत उभा होता! पाच मिनिटांची डुलकी फारच महागात पडली होती. आम्ही लगेचच नाश्त्याची ऑर्डर दिली आणि घाईघाईत आवरायला लागलो. सगळं होईस्तोवर आठ वाजले. तसा संपूर्ण दिवस हाताशी होता. त्यामुळे तासभर उशीर म्हणजे काही फार काळजीचं कारण नव्हतं. 

भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य प्रवेशद्वार 

एकदाची आमची वरात निघाली. वातावरण प्रसन्न होतं. ऑगस्ट महिना असला तरी पावसाचा जोर फार नव्हता. रात्री कधीतरी एखादी सर येऊन गेलेली असावी. हवेतला तो ओलसर गारवा हवाहवासा वाटत होता. चिंब वनराई आळोखे-पिळोखे देत होती. गर्द झाडीतून जाणारा तो तुळतुळीत डांबरी रस्ता अजूनही झोपल्यागतच वाटत होता. मधेच उतरत्या छपराची, भलामोठा सोपा असलेली टुमदार घरे दिसत होती. अगदी तळकोकणात असावे असे वाटत होते. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले गोव्यातले जिल्हे म्हणजे एक वेगळीच दुनिया! पोर्तुगीजांच्या प्रभावाखाली फारसा न आलेला हा भाग गोव्याच्या मूळ संस्कृतीचे दर्शन घडवतो. त्यामुळेच या भागाचे कोकणाशी असलेले साधर्म्य अगदी उठून दिसत होते. हळूहळू घरे मागे पडली आणि घनदाट अरण्य सुरु झाले. इतक्यात ‘भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य’ असा फलक दिसला. तिथून पुढे निघालो आणि आजूबाजूचे रान अजूनच दाट झाल्यासारखे भासू लागले. अर्ध्या तासातच आम्ही तांबडी सुर्ला महादेव मंदिरापाशी पोहोचलो. इथूनच ट्रेक सुरु होतो. सकाळची वेळ असल्याने परिसर अगदी शांत होता. मंदिराबाहेरचे दुकानदार नुकतेच दुकान उघडून चहाचा घोट घेत बसले होते. आम्ही लगेचच ट्रेक सुरु केला.

घनदाट रानातली पाऊलवाट   

मंदिराच्या बाहेरून रानात शिरणारी ती तांबूसराड वाट आम्ही धरली आणि मोठ्या उत्साहात पुढे निघालो. पाचेक मिनिटातच गर्द रानाच्या मध्यात पोहोचलो. रानाचा तो विशिष्ट वास आसमंतात भरून राहिला होता. बाजूनेच एक ओढा खळाळत होता. मी लगेचच कॅमेरा बाहेर काढला. नशिबाने पाऊस नव्हता. इकडे-तिकडे फोटो काढत आमचा ट्रेक सुरु होता. पावसाळी ट्रेकिंग मध्ये वाटेत येणारे ओढे पार करणे म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. विशिष्ट दगडांवर पाय टाकत, तोल सावरत, कमीत कमी ओले होत पुढे जायचा उगीच प्रयत्न करायचा. मग शेवटी थोडा भिजलोच आहे अजून भिजूया असे म्हणून पाण्यातच बसकण मारायची! इथला ओढा काही त्याला अपवाद नव्हता. पण आज भिजण्यासाठी धबधब्यावर जायचे होते. म्हणून ओढ्याचा मोह टाळून आम्ही पुढे निघालो. आता वाट लहान-मोठ्या चढ-उतारावरून जात होती. रानातल्या दमट उष्म्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. हवेतली आर्द्रता एवढी होती की चष्म्यावर सतत बाष्प जमा होत होते. अशी आर्द्रता कॅमेराला फारच मारक. मी मुकाट्याने कॅमेरा आत टाकला. 

हिरवंगार रान आणि खळाळणारा ओढा   

क्रमशः 

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ७ - शेवटचा दिस गोड व्हावा!

पाथार नचुनीच्या कॅम्प साईटवरची ती पहाट जरा आळसावलेलीच होती. गेल्या दोन दिवसांतल्या तंगडतोडीने थकलेल्या गात्रांना आता घरची ओढ लागली होती. काश teleportation शक्य असते. पण रूपकुंड काही इतक्या सहजासहजी घरी पोहोचू देणार नव्हते. ज्या वाटेने चढायला तीन दिवस लागले होते ती वाट आज एका दिवसात उतरून जायची होती. एकूण अंतर होते १७ किमी! पण वाट उताराची होती. शिवाय ऑक्सिजनचे प्रमाण वाढत जाणार होते. त्यामुळे अंतराचे फारसे भय नव्हते. नाश्त्याला आज आलू पराठ्यांचा बेत होता. इतक्या सगळ्या लोकांसाठी पराठे लाटून होईपर्यंत आठ वाजले. पण यावेळी पराठे मात्र फक्कड जमले होते. गरमागरम पराठे ओरपून आम्ही खाली उतरायला सज्ज झालो. 

वातावरण फोटोग्राफीसाठी एकदम अनुकूल होते

ट्रेकमध्ये कायम मागे असणारा मी यावेळी पुढे सरसावलो होतो. वातावरण स्वच्छ होते. उताराच्या दिशेने चालताना ती अजगर-वाट अगदीच सौम्य वाटत होती. कालच्या गारांचा चिखल अधूनमधून त्या भयंकर गारपिटीची आठवण करून देत होता. मधेच ढगांचे पुंजके त्या वाटेला हलकासा स्पर्श करून जात होते. पलीकडे दिसणारी शिखरे त्याच स्थितप्रज्ञतेने सारा निसर्ग न्याहाळत होती. फोटोग्राफीसाठी आज उत्तम वातावरण होते. गेल्या दोन दिवसांतले रौद्र सौंदर्य मनसोक्त कॅमेऱ्यात टिपता न आल्याची थोडी खंत वाटत होती. आज ती कसर भरून काढायचे ठरवले. ग्रुपमधली मंडळी पण एकदम सेल्फी मूडमध्ये होती. रमत-गमत आम्ही बेदिनी बुग्यालपर्यंत पोहोचलो. इथून पुढे रस्ता वेगळा होता. चढताना अली बुग्याल आणि डिडना मार्गे आलो होतो. पण उतरताना मात्र घरोली पाताळ आणि नीलगंगा मार्गे वाण गावात उतरणार होतो. वाट वेगळी असल्याने तिथल्या भूदृश्याबाबत मनात उत्सुकता होती. 

बेदिनी बुग्यालचा पठारी प्रदेश संपून तीव्र उतार सुरु झाला 

हळूहळू रानात उतरणारी वाट 
हळूहळू बुग्यालचा सपाट प्रदेश मागे पडला. तीव्र उतार सुरु झाला. म्हणता म्हणता वाट सरळ गच्च रानात शिरली. त्या उंच झाडांतून निळ्या आभाळाचे लहान-सहान तुकडे मिचमिचताना दिसत होते. वातावरणातली आर्द्रता जाणवत होती. इथे ऱ्होडोडेंड्रॉनची झाडे मुबलक दिसत होती. पण कदाचित या भागातला फुलांचा बहर येऊन गेला होता. फांद्यांच्या टोकांवर फुटलेली हिरवीगार पालवी मोहक दिसत होती. उंच आणि धिप्पाड असे देवदार वृक्ष उतारावर घट्ट मुळे रोवून खंबीरपणे उभे होते. उद्या प्रलय होऊन जग उलटे-पालटे झाले तरी हे वृक्ष जागचे हलणार नाहीत असा दृढ विश्वास त्यांच्या नुसत्या अस्तित्वातून प्रतीत होत होता. या वाटेने चढणे नक्कीच अली बुग्यालच्या वाटेपेक्षा जास्त कठीण होते. इथून चढणारे ट्रेकर्स अजून किती चढायचे आहे असे केविलवाण्या चेहऱ्याने विचारत होते. तसेही ट्रेकिंगमध्ये या प्रश्नाचे उत्तर कधीही “तुम्ही जवळपास पोहोचलातच” असेच द्यायचे असते! आम्हीही तोच कित्ता गिरवत होतो. वर चाललेल्या ट्रेकर्सना शुभेच्छा देत आम्ही खाली उतरत होतो. 

घनदाट रानात वसलेली घरोली पाताळ ची कॅम्प साईट 

अचल देवदार 
दोनेक तासांच्या उतरणीनंतर घरोली पाताळची कॅम्प साईट दिसू लागली. घनदाट रानाच्या मध्यात एका लहानशा पठारावर ती कॅम्प साईट वसली होती. इथली उंची होती २४०० मीटर. ऑक्सिजन पातळीच्या दृष्टीने आम्ही आता ‘सेफ झोन’ मध्ये आलो होतो. थोडावेळ तिथे विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. दूरवरून वाहत्या पाण्याचा खळखळ आवाज येऊ लागला. नीलगंगा जवळ येत असल्याची ती खूण होती. आम्ही पावलांचा वेग वाढवला. नागमोडी वळणांना छेद देत उतारावरून घसरगुंडी करत खाली उतरण्यात मजा येत होती. आता खोल दरीतला पाण्याचा प्रवाह दिसू लागला. नदीच्या काठावर एक तात्पुरती शेड उभारलेली दिसत होती. आमची जेवायची सोय  इथेच होती. एकदाचे तिथे पोहोचलो. त्या अरुंद दरीतून नीलगंगेचा अवखळ प्रवाह खळखळ करत पुढे चालला होता. आजूबाजूचे डोंगर आणि वृक्षराजी त्या प्रवाहात आपले रुपडे पाहण्यात गुंतले होते. आतापर्यंत अनुभवलेल्या रौद निसर्गरुपांपुढे हे शांत आणि लोभस रूप मानला एक वेगळाच आनंद देत होते. बूट काढून नदीच्या पाण्यात पाय बुडवले. थंडगार पाण्याचा पायांना स्पर्श होताच सारा थकवा दूर झाल्यासारखे वाटले. काश त्या पाण्यात यथेच्छ डुंबता आले असते. पण अजून एक चतुर्थांश अंतर बाकी होते. नाईलाजानेच पाण्याबाहेर आलो. गरमागरम राजमा चावल तयारच होते. जेवण होतंय ना होतंय तेवढ्यात ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी सुरु झाल्या. हा पाऊस काही आमचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. ट्रेकमधल्या प्रत्येक दिवशी साधारण दुपारच्या वेळी वेळापत्रक ठरल्यागत तो हजेरी लावत होता. आता शेवटचे एक चतुर्थांश अंतर पावसात पार करणे अगदी जीवावर आले होते. पण दुसरा पर्याय काय? रेनकोट घातले आणि चालायला सुरुवात केली. 


खोल दरीत दिसणारा नीलगंगेचा प्रवाह 
नदीवरच्या अरुंद पुलावरून पलीकडे गेलो आणि पाहतो तर काय, वाट सरळ समोरच्या टेकडीवर चढत होती! ट्रेकचा उरलासुरला भाग, त्यात पाऊस, आणि परत चढण? आता मात्र हद्द झाली! कधी संपणार हा ट्रेक? स्वखुशीने तर आलो आपण ट्रेकला. ना कोणी जबरदस्ती केली होती ना कोणी बक्षीस देणार होतं ट्रेक पूर्ण केल्याचं. मग कशाला आलो आपण इथे तंगडतोड करायला? प्रत्येक ट्रेक मध्ये कोणत्या ना कोणत्या क्षणी हे असे विचार मनात येतातच. आता पुन्हा असले उपद्व्याप नाही असं कुठेतरी मन ठरवूनही टाकतं. पण पुन्हा दोन-चार महिन्यांनी गिरीशिखरांचे वेध लागू लागतात. त्या अनवट निसर्गाचा उपभोग घेण्यासाठी जीव झुरू लागतो. आणि पुन्हा कधीतरी मी असा पावसा-पाण्यात, निसरड्या वाटेवर, ‘अजून किती चढायचं आहे’ असं विचारत चढू लागलेला असतो. व्यसन म्हणावं तर यालाच का? त्या तांबूसराड वाटेवरून हळूहळू वर चढताना मन ट्रेकिंग करण्यामागच्या मूलभूत प्रेरणेचा शोध घेत होतं. स्वतःला निसर्गाच्या हवाली करण्यात एक अध्यात्मिक आनंद आहे. शरीराच्या कितीही अपेष्टा होत असल्या तरी मनाला मिळणारे समाधान शब्दातीत आहे. प्रत्येक ट्रेक काहीतरी नवीन शिकवून जातो. नवे सवंगडी मिळवून देतो. ट्रेकमधले ते भले-बुरे क्षण आठवणींच्या गाठोड्यात मुरत जातात आणि आयुष्याची चव उत्तरोत्तर अधिक रुचकर करत जातात.

वाण  गावातला बऱ्याच दिवसांनी दिसलेला पक्का गाडी रस्ता 

चढण संपता संपता एक गाव लागलं. आम्ही ट्रेकर्स दिसताच गावातली लहान-सहान पोरं गलका करत जमा झाली. आपल्या गोड आवाजात ती पोरं सगळ्यांना नमस्ते म्हणत होती. ट्रेकच्या या शेवटच्या दिवशी पोरांमध्ये वाटायलाही काही उरलं नव्हतं. पाऊस आता थांबला होता. गावाशेजारी एक हॉटेल होतं. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही पुढे निघालो. लहान-मोठ्या वस्त्यांमधून ती वाट पुढे जात होती. काही वेळातच थोडे मोठे गाव दिसू लागले. वाण गावच्या मुख्य चौकात उतरणारी ती शेवटची पायरी आम्ही उतरलो आणि अत्यानंदाने एकमेकांना टाळ्या दिल्या. ट्रेक संपल्याचा तो क्षण म्हणजे अवर्णनीय असाच होता. गावातल्याच एका दुकानात चहा पिऊन आम्ही तो ट्रेकांत साजरा केला. इथून पुढे जीपने लोहाजुंगच्या बेस कॅम्प वर जायची सोय केलेली होती. लोहाजुंगला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. झोपायला गादी आणि पांघरायला दुलई म्हणजे ऐषाराम वाटत होता. सगळ्यांनी एकत्र जमून रघू, विकी, आणि विजयेंद्रजी यांचे मनःपूर्वक आभार मानले. विकीला त्याच्या करियरसाठी शुभेच्छा दिल्या. कुंडदर्शन हुकल्याची काहीशी रुखरुख मनाला जाणवत होती. आयुष्यात परत कधी योग आला तर कुंडदर्शनासाठी नक्की येईन असे मनाशी ठरवून ‘ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड’ या न्यायाने गोड मानलेल्या रूपकुंडला मनोमन अलविदा केले आणि अंगावर दुलई ओढून झोपी गेलो.                                                                     

समाप्त 

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ६ - हुकलेले कुंडदर्शन

काळू विनायकाच्या शेजारील हॉटेलातून बाहेर पडलो तेव्हा गारपीट नुकतीच थांबली होती. गारांचा वर्षाव करणारा तो काळाकुट्ट ढग आता दरीच्या दिशेने पांगला होता. त्या आलेदार चहाने थोडीफार हुशारी वाटत होती. डोकं ठणकत होतंच. पण भग्वबासाचा कॅम्प समोरच दिसत होता. त्यामुळे सगळ्या शरीराच्या अपेष्टांकडे दुर्लक्ष करून मी पुढे चाललो होतो. वाट तर सपाटच होती. पण संपूर्ण वाटेवर गारांचा खच पडला होता. त्यामुळे वाट फारच निसरडी झाली होती. काळजीपूर्वक एकेक पाउल टाकत आमची वरात चालली होती. तेवढ्यात होते-नव्हते ते सारे ढग कुठेतरी गायब झाले आणि सूर्याची प्रखर किरणे त्या भूदृश्यावर झेपावली. अंधाऱ्या बोगद्यातून दीर्घकाळ चाललेली ट्रेन अचानक बाहेर यावी आणि बाहेरच्या प्रकाशाने डोळे दिपून जावेत तसेच काहीसे झाले. त्या प्रखर प्रकाशात त्या वाटेवर पडलेल्या गारा आणि आजूबाजूच्या डोंगरावर पडलेले बर्फ अक्षरशः तळपू लागले. दहा मिनिटांपूर्वी गारांच्या तडाख्यातून बाहेर पडलेले आम्ही आता बॅगेत गॉगल शोधू लागलो. खड्या चढणीवर लागलेली गारपीट, त्याच्या नंतरचा आल्याचा चहा, आणि आता समोर उभे ठाकलेले हे अवर्णनीय दृश्य! हिमालयातला ट्रेक तुम्हाला निसर्गाची विविधरंगी रूपे कधी आणि कोणत्या क्रमाने दाखवेल याचा काहीएक नेम नसतो. ही अनिश्चितताच हिमालयातल्या ट्रेकचे व्यसन लावते.   

भग्वबासा कॅम्प साईट  

त्या तळपत्या बर्फाळ वाटेवरून आम्ही सावकाश पुढे निघालो होतो. डावीकडच्या डोंगररांगेच्या मागे त्रिशूल आणि नंदा घुंटी ही शिखरं दिमाखात उभी होती. त्यांच्यावरची बर्फाची चादर थोडी जास्त जाड झाल्यासारखी वाटत होती. उजवीकडचा बोडका डोंगरही बर्फाने माखला होता. कॅम्पसाईटच्या मागच्या रांगेच्या खोबणीत कुठेतरी रूपकुंड वसले होते. त्याकडे जाणारी वाट एका पुसट रेघेसारखी दिसत होती. उद्या याच वाटेने आपल्याला कुंडाच्या दर्शनासाठी जायचे आहे अशी मनातल्या मनात मी तयारी करत होतो. कधी एकदा कॅम्प साईटवर पोहोचतोय असे झाले होते. म्हणता म्हणता ती वाट संपली. त्या प्रचंड बर्फाळ पठारावर वसलेल्या कॅम्प साईट वर आम्ही एकदाचे पोहोचलो. ही कॅम्प साईट म्हणजे जणू एक लहान गावच होते. जवळपास शंभर-दोनशे तंबू तिथे लागले होते. त्या जोडीने हॉटेल्स, खेचरांसाठी बांधलेल्या शेड्स, या सर्व सोई पुरवणाऱ्या लोकांचे तंबू वगैरे होतेच. रूपकुंडची लोकप्रियता आता कुठे जाणवत होती. थोडा वेळ तंबूमध्ये विश्रांती घेऊन मी आजूबाजूला भटकायला बाहेर पडलो. निसरड्या बर्फामुळे फार लांब कुठे जाता येत नव्हतं. शिवाय दर दोन पावलांवर दम लागत होता. इथली उंची होती ४३०० मीटर! ऑक्सिजनची कमतरता चांगलीच जाणवत होती. ग्रुपमधले ४ जण अर्ध्या वाटेतच पाथार नचुनीला परत गेले होते. त्यामुळे आता इथे जेमतेम १५ जण उरलो होतो. उद्याच्या अंतिम टप्प्याबद्दल मनात हुरहूर दाटून आली होती. 

४३०० मीटर उंचीवर बर्फात लागलेले तंबू 

संध्याकाळचे सूप घेऊन रघू आला. पुढच्या दिवशीच्या महत्त्वाच्या सूचनांसाठी त्याने सगळ्यांना एकत्र बोलावले. कुंडाकडे जाण्यासाठी पहाटे २ वाजता निघायचे होते. त्यासाठी बर्फावर चालायचे काटेरी बूट आम्हाला मिळणार होते. बूट वाटण्याआधी त्याने सगळ्यांची ऑक्सिजन पातळी तपासली. साधारण ८० च्या वर ऑक्सिजन असलेल्यांनाच कुंडाकडे जाण्यास परवानगी होती. माझ्या बोटाला ते यंत्र लावले आणि आकडा आला ६५! मी धास्तावलोच! इतका कमी कसा असेल ऑक्सिजन? मला डोकेदुखी वगळता बाकी काहीच होत नव्हतं. रघू म्हणाला, AMS (acute mountain sickness) काही सांगून येत नाही. कोणतीही पूर्वलक्षणे न दिसताही त्या उंचीवर माणूस अचानक आजारी पडू शकतो. आजार बळावला तर त्याला खाली आणण्याशिवाय गत्यंतर नसते. आणि वेळेत खाली आणता नाही आले, तर मृत्यूही ओढावू शकतो. या सगळ्या शक्यतांची मला ऐकून-वाचून माहिती होती. पण त्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव आत्ता पहिल्यांदाच येत होता. उगीच विषाची परीक्षा कशाला? कोण बक्षीस देणार आहे मला कुंडापर्यंत गेल्याचं? जे करतोय ते निव्वळ निसर्गप्रेमासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानासाठी. मग उगीच जीव कशाला धोक्यात घालायचा? मी मनोमन वर न जाण्याचा निर्णय घेतला. सोबतच्या बऱ्याच जणांची ऑक्सिजन पातळी कमी होती. त्यांपैकीही कोणीच वर जाणार नव्हते. जेमतेम ८-१० जणांनी वर जायची तयारी दाखवली. त्यांना आवश्यक त्या सूचना आणि बर्फावर चालायचे प्रात्यक्षिक दाखवून रघू रात्रीच्या जेवणाची तयारी करायला निघून गेला. 

रूपकुंड कडे जाणारी वाट 

अंधार पडू लागला तशी थंडी वाढू लागली. आता बाहेर थांबणे काही शक्य होत नव्हते. पटापट जेवण उरकून आम्ही तंबूमध्ये येऊन विसावलो. काही वेळातच गडद ढगांच्या दुलईत कॅम्प साईट हरवून गेली. होते नव्हते ते सारे कपडे अंगावर चढवले. स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. झोप कसली लागतेय! एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळतानासुद्धा दम लागत होता. त्यात थंडीने हुडहुडी भरत होती. तशात उठून मूत्रविसर्जनासाठी बाहेर जाणं म्हणजे तर दिव्यच! आयुष्यात अशी परिस्थिती कधी आली नसेल की निव्वळ शरीरधर्म उरकणे म्हणजे मोठे संकट वाटावे! तासाभराने पुन्हा रघू ऑक्सिजन पातळी तपासायला आला. अजूनही आकडा ६० च्या पुढेमागेच दिसत होता. मला आता काळजी वाटू लागली. पण या उंचीवर ऑक्सिजनचे हे प्रमाण तसे नॉर्मल होते. अजून जास्त उंचीवर जाणे किंवा कोणतीही दम लागू शकेल अशी हालचाल करणे मात्र योग्य नव्हते. मी शांतपणे पडून प्राणायम करताना घेतात तसे दीर्घ श्वास घेऊ लागलो. वर न जाण्याचा माझा निर्णय योग्यच होता. कधीतरी डोळा लागला. पहाटे तीनला कुंडावर जाणाऱ्यांची लगबग सुरु झाली तशी झोप उडाली. वर जाणाऱ्या मंडळींना बसल्या जागेवरून शुभेच्छा देऊन मी पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागलो. 

सकाळी सातच्या सुमारास विकी सगळ्यांना उठवायला आला. डोकं प्रचंड ठणकत होतं. कसाबसा आवरून तंबूच्या बाहेर पडलो. उपचारापुरता नाश्ता केला. कुंडाकडे गेलेल्या लोकांसोबत रघू गेला होता. विकी आणि विजयेंद्रजी खाली थांबलेल्या आम्हा लोकांना पाथार नचुनी पर्यंत घेऊन जाणार होते. तब्येतीच्या अवघड अवस्थेतून बाहेर येण्यास खाली उतरणे हा एकमेव मार्ग होता. नशिबाने रस्ता उताराचा होता. स्वच्छ ऊन पडलं होतं. लवकरच आम्ही पाथार नचुनीच्या मार्गाला लागलो. कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रेकर्सची रांग दिसत होती. आजूबाजूची शिखरे अजूनही ढगांच्या दुलईतून बाहेर पडली नव्हती. वाटेवरचे बर्फ रात्रीच्या थंडीमुळे गोठलेले दिसत होते. अर्ध्या तासातच आम्ही काळू विनायकापाशी पोहोचलो. काल ढगात हरवलेले ते मंदिर आज मोकळ्या वातावरणात फारच विलोभनीय दिसत होते. हा विनायक म्हणजे रूपकुंडचा रक्षणकर्ता. जोपर्यंत त्याची कृपा आहे तोवर सारे काही सुरळीत राहील अशी स्थानिकांची श्रद्धा. अनिश्चित आणि अस्थिर निसर्गापुढे टिकून राहण्यासाठी श्रद्धेचे बळ किती महत्वाचे आहे हे अशा ठिकाणी गेल्यावर कळते. इथे ना होता कोणी पुजारी, ना होते नवस-सायास करायला ठराविक दिवशी चेंगराचेंगरी करत येणारे भक्तगण. होते ते केवळ त्याच्या अस्तित्वाचे एक प्रतीक! त्या रौद्रभीषण निसर्गापुढे जगण्याची उभारी देणारा एक आधार. देवत्व असे शुद्ध अवस्थेत फार कमी ठिकाणी बघायला मिळते. कठोर नास्तिक असलेले माझे मन त्या ठिकाणी, का कोण जाणे, थोडेसे हळवे झाले.                           

काळू विनायक मंदिर (फोटो सौजन्य - सौरभ ताम्हनकर)

आता तीव्र उताराची वाट सुरु झाली. काल जिथे गारांनी झोडपलं होतं त्या जागी आज चिखलातून वाट काढत, न घसरता, न पडता खाली उतरणं हे मोठं आव्हान होतं. हळूहळू आम्ही खाली उतरलो. पाथार नचुनीच्या कॅम्पवर  पोहोचलो तेव्हा कुठे जीवात जीव आला. आम्ही तंबूत शिरलो आणि तेवढ्यात कालच्यापेक्षाही जोरदार अशी गारपीट सुरु झाली. थोडक्यात बचावलो म्हणून हायसे वाटले. मी एक क्रोसिनची गोळी घेतली आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. डोकेदुखी आता बऱ्यापैकी कमी झाली होती. आजची रात्र इथेच काढायची होती. संध्याकाळी गप्पा-टप्पा करून लवकरच झोपी गेलो.

क्रमशः