विविधरंगी बस्तर - भाग २ - चित्रकोट जलप्रपात

पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाटे पावणेसहालाच जाग आली. पहाटेचा गारवा आल्हाददायक वाटत होता. तंबूच्या बाहेर आलो आणि थबकलोच. तो महाकाय चित्रकोट धबधबा थेट समोरच कोसळत होता. रात्रीच्या अंधारात त्याचा केवळ आवाज ऐकू येत होता. आता पहाटेच्या मंद प्रकाशात त्याचे महाकाय रूप डोळ्यांसमोर उभे होते. दोन क्षण स्तब्धपणे मी निव्वळ समोरचे दृश्य पहात उभा राहिलो. जवळपास दीड किमी रुंदीचे इरावती नदीचे पात्र, त्याला आलेला काहीसा अंतर्वक्र आकार, आणि त्यावरून धबाबा कोसळणारे फेसाळते पाणी. मंद धुक्यातून पूर्व क्षितिजावर उगवलेला सहस्ररश्मी, त्याच्या केशरी प्रभेत न्हालेला आसमंत, पहाटेची निश्चल शांतता, आणि तिला पुरून उरणारा त्या प्रपाताचा ध्रोंकार! सारे विलक्षणच होते. मी ताबडतोब कॅमेरा काढला आणि तो क्षण बंदिस्त केला. अर्थात, कॅमेऱ्याच्या सेन्सरवर उमटलेले ते चित्र आणि त्या क्षणाची अनुभूती यात जमीन-अस्मानाचे अंतर होते. असो. 

पहाटेच्या केशरी प्रकाशात चित्रकोट धबधबा 

कॅम्पसाईटच्या बाजूलाच एक निरीक्षण मनोरा उभारलेला होता. त्याच्या खाली दोन-चार खोल्या, स्वच्छतागृह आणि स्वयंपाकाची व्यवस्था उपलब्ध होती. खालच्या खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध व्हायला अजून वेळ होता. मुख्य म्हणजे अजून विजेची व्यवस्था झालेली नव्हती. जीतने मोठ्या कल्पकतेने ती जागा कॅम्पसाईट साठी निवडली होती. मनोऱ्याच्या गच्चीवरून तर धबधब्याचे दृश्य अधिकच मोहक दिसत होते. एक-एक करत सारी मंडळी उठली. तेवढ्यात चहा आलाच. गच्चीवरून धबधबा न्याहाळत आम्ही गरम चहाचा आस्वाद घेत होतो. एकीकडे जीत बस्तरची आणि लोकजीवनाची माहिती देत होता. जीत मूळचा जगदालपूरचा. उच्च शिक्षण, मग मोठ्या शहरात नोकरी, आणि देशभर भटकंती करून तो आपल्या मूळ शहरात परतला होता. बस्तरचे अनवट सौंदर्य जगासमोर आणण्यासाठी त्याने Unexplored Bastar नामक कंपनी सुरु केली. पर्यटकांना त्यांचा पसंतीनुसार रूपरेषा बनवून देण्यासोबतच स्थानिक लोकांना रोजगार, त्यांच्या संस्कृतीचे जतन, आणि पर्यावरण संवर्धन असा व्यापक हेतू डोळ्यांसमोर ठेऊन तो काम करतो. सध्या तरी सुरुवातीचे दिवस आहेत. पण एकंदरीत मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे. त्याच्या धाडसाचे आणि ध्येयासक्तीचे आम्हा सगळ्यांनाच फार कौतुक वाटले. एव्हाना आठ वाजत आले होते. नाश्ता तयार व्हायला थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे आधीच धबधब्यावर जाऊन यायचे आम्ही ठरवले. 

मनोऱ्याच्या गच्चीवर

मनोऱ्याच्या मागच्या बाजूने एक वाट खाली उतरत होती. वाट कसली, चांगला बांधलेला जिनाच होता तो. तिथून खाली उतरून आम्ही नदीच्या पात्राजवळ पोहोचलो. काठाने वाढलेल्या झाडीतून वाट काढत प्रवाहाच्या डाव्या अंगाने धबधब्याजवळ जाऊ लागलो. पाण्याचा प्रवाह कमी असतो तेव्हा त्या वाटेने चक्क मुख्य धबधब्याच्या मागे जाता येते. मात्र सध्या प्रवाह चांगलाच तेजीत होता. शिवाय पुढचे दगड निसरडे झाले होते. त्यामुळे ठराविक अंतरापर्यंतच जायला मुभा होती. झाडीतून बाहेर पडलो तसे नदीचे पात्र नजरेस पडले. तिथे एक स्थानिक तरुण लहानशी होडी घेऊन उभा होता. होडीतून पात्राच्या मध्यात जाऊन समोरासमोर धबधबा पाहण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक होतो. सगळ्यांनी लगेचच त्याच्यासमोर रांग लावली. तिथे गर्दी झालेली बघून आम्ही दोन-तीन जणांनी थोडे आसपास फिरून यायचे ठरवले. त्याच वाटेने आम्ही पुढे निघालो. 

धबधब्याच्या समोर घेऊन जाणारा नावाडी 

चिंचोळी वाट 
आता डावीकडे उंच कडा आणि उजवीकडे नदीचे पात्र अशा चिंचोळ्या पट्ट्यातून ती वाट जात होती. कड्याच्या पोटात काही गुहा खोदलेल्या दिसत होत्या. त्यात काही शिवलिंगे आणि कोरीव मूर्तीही दिसत होत्या. कधी काळी इथे एखादे मंदिर असावे. काही अंतरातच ती वाट प्रचंड शिळांच्या ढिगाऱ्यात हरवली. पुढे जाणे धोकादायक होते. आम्ही तिथेच थांबलो. धबधब्याचा ध्रोंकार आता कानांवर आदळत होता. प्रवाहाची एक लहानशी धार कुठूनतरी वेगळी होऊन डावीकडच्या कड्यावरून समोरच्या दगडावर कोसळत होती. त्याचे तुषार अंगावर उडत होते. त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या शिळा, बाजूला विखुरलेले कोरीव भग्नावशेष, आणि समोरचा तो महाकाय जलप्रपात त्या जागेला एक अद्भुत आयाम देत होते. तिथे थोडेफार फोटो काढून मी काही क्षण ती जागा अनुभवत शांत उभा राहिलो. समोर कोसळणारी ती धार खुणावत होती. फार विचार न करता मी सरळ त्या धारेखाली जाऊन बसलो. थंड पाणी मस्तकावर आदळले आणि एक शिरशिरी देहात जाणवली. क्षणभर कुडकुडलो, पण लगेचच त्या तापमानाला शरीर सरावले, आणि मन त्या प्रवाहाशी जणू एकरूप झाले. ब्रह्मानंद म्हणतात तो हाच का? 

अद्भुतरम्य जागा 
किती वेळ मी तिथे बसलो होतो देव जाणे! माझी तंद्री भंगली तेव्हा कळले की सोबतचे दोघे कधीच मागे गेले होते आणि कोणीतरी लांबून मला हाका मारत होते. चरफडतच मी उठलो आणि कॅम्पसाईटवर परतलो. नाश्ता तयार होता. खास बस्तर पद्धतीचा दालवडा आणि चटणी यांवर आम्ही ताव मारला. सोबतीला चहाची अजून एक फेरी होतीच. आता उन्हं वर आली होती. धबधब्याच्या बाजूने काहीसे फिकट इंद्रधनुष्य तयार झाले होते. दिवसाच्या प्रत्येक वेळी तो धबधबा आपल्या सौंदर्याची वेगळी छटा दाखवत होता. त्याचे किती फोटो काढू आणि किती नको असे होत होते. अखेरीस जीत म्हणाला, अजून तीन-चार धबधबे बाकी आहेत बघायचे. कॅमेऱ्याची बॅटरी आणि मनाचा उत्साह जपून ठेवा! तरी मी अजून थोडे फोटो काढलेच. सगळ्यांचा नाश्ता आणि आन्हिकं उरकल्यावर आम्ही आसपासच्या इतर काही जागा पाहण्यासाठी बाहेर पडलो.  



उन्हं वर आल्यावर चकाकणारे धबधब्याचे पाणी 
क्रमश: 

विविधरंगी बस्तर - भाग १ - बस्तरची तोंडओळख

काही दिवसांपूर्वीच “न्यूटन” चित्रपट पाहिला होता. त्यातली नाट्यमयता आणि कलाकारांचा अभिनय अप्रतिमच. पण त्याहूनही मनात भरलं होतं ते छत्तीसगढ मधल्या दुर्गम प्रदेशातलं अरण्य. रानावनाची ओढ पहिल्यापासूनच. त्यात फारसा परिचित नसलेला प्रदेश आणि अनवट निसर्गासोबत तोंडी लावायला मिळणारं अद्भुत लोकजीवन पाहून मी मोठ्या उत्सुकतेने छत्तीसगढला जाण्यासाठी माहिती शोधू लागलो. गुगलवर तर माओवाद्यांनी केलेले हल्ले आणि त्यात मारले गेलेले पोलीस किंवा नागरिक याव्यतिरिक्त काही दिसतच नव्हतं. आधीच दुर्गम प्रदेश आणि त्यात असे असुरक्षित वातावरण. त्यामुळे एकट्याने प्रवास करणे जरा अवघडच होणार होते. योगायोगाने एका माहितीतल्या ग्रुपने पुढच्याच महिन्यात चार दिवसांची बस्तर ट्रीप आयोजित केली असल्याचे फेसबुकवर वाचनात आले. सुट्टीचं आणि पैशाचं गणित जुळतंय हे बघून मी ताबडतोब ट्रीप बुक करून टाकली.

बस्तर जिल्ह्याचे स्थान 
बस्तर म्हणजे दक्षिण-पूर्व छत्तीसगढमधला ओदिशाच्या सीमेला लागून असलेला जिल्हा. दख्खनचे पठार आणि पूर्व घाट यांच्या सीमेवर असलेला बस्तर जिल्हा समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर वसलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हे एक संस्थान होते. सध्याचे बस्तर, दांतेवाडा आणि कांकड असे तीन जिल्हे मिळून या संस्थानाचा पसारा होता. साधारण १५०००० लोकवस्ती असलेले जगदालपूर आज जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्यातली ७०% लोकसंख्या आदिवासी असून गोंड, भरता, आणि मारिया या त्यांपैकी मुख्य जमाती होत. बऱ्याच जमाती अजूनही सुदूर घनदाट अरण्यांत राहतात आणि बाहेरील लोकांशी फारशा मिसळत नाहीत. पूर्वापार चालत आलेल्या त्यांच्या प्रथा-परंपरा अजूनही टिकून आहेत. बस्तरमध्ये दसऱ्याच्या दिवशी होणारा लोकोत्सव हा सुप्रसिद्ध आहे. आमची ट्रीप दसऱ्याच्या सुमारासच आयोजित केलेली होती. या वर्षीचा परतीचा पाऊस रेंगाळला होता. नवरात्र सुरु झाले तरी अधूनमधून सरी येत होत्या. त्यामुळे कोसळणारे धबधबे आणि हिरव्यागार वनराईसोबत एक वेगळा सांस्कृतिक अनुभव मिळणार या विचाराने मी भलत्याच उत्साहात होतो. 

यथावकाश प्रवासाचा दिवस उजाडला. संध्याकाळी साडेआठला सुटणाऱ्या समरसता एक्स्प्रेसचे आरक्षण होते. यावेळी ग्रुप केवळ दहा जणांचा होता. सगळ्यांशी ओळखी-पाळखी झाल्या आणि आमचा प्रवास सुरु झाला. मुंबई ते रायपूर म्हणजे सुमारे अठरा तासांचा प्रवास. एवढा प्रवास, तोही स्लीपर कोचमधून करायचा म्हणजे मी थोडा धास्तावलोच होतो. पण ऑफ सिझन असल्याने गाडीला विशेष गर्दी नव्हती. दिवसभरच्या दगदगीने मी शिणलो होतो. बर्थ मिळताच आडवा झालो. स्लीपर कोच मधल्या कोलाहलातली झोप म्हणजे यथा-तथाच. थोडाफार वेळ डोळा लागला तरी खूप. म्हणता म्हणता गाडी रायपूरला पोहोचली. भारतीय रेल्वेच्या वक्तशीरपणाचा मान राखत गाडीने चांगला दीडेक तास उशीर केला होता. लांबच्या प्रवासाने आम्ही सगळेच कंटाळले होतो. त्यात पावसाची चिन्हं दिसत होती. त्या उष्ण आणि दमट हवेत जीव नकोसा होत होता. इथून पुढे बस्तरमधली एक स्थानिक पर्यटन कंपनी आमची व्यवस्था बघणार होती. त्या कंपनीचे प्रतिनिधी पार्किंगच्या जागेत आमची वाट बघत थांबले होते. आम्ही येताच त्यांनी गळ्यात हार आणि कपाळाला गंध लावून आमचे जंगी स्वागत केले. इतक्या प्रसन्न स्वागताने आमचा शिणवटा कुठच्या कुठे पळाला! मोठ्या उत्साहात आम्ही बसमध्ये बसलो. 

रायपूरमध्ये झालेले जंगी स्वागत 

आमचा पहिला मुक्काम होता चित्रकोट धबधबा. रायपूरहून तिथले अंतर होते सात तासांचे! थोडक्यात प्रवास अजून संपला नव्हताच! मजा-मस्ती करत आमची गाडी चित्रकोटकडे निघाली. वाटेत थोडा वेळ जेवणासाठी थांबून आम्ही पुढे रवाना झालो. अंधार पडल्याने आजूबाजूचा निसर्ग काही अनुभवता येत नव्हता. मी गुमान कानात हेडफोन घालून झोपायचा प्रयत्न करू लागलो. निद्रादेवी काही प्रसन्न होत नव्हती. अखेरीस रात्री एकच्या सुमारास आम्ही चित्रकोट धबधब्याला पोहोचलो. बसमधून उतरलो आणि एक ओलसर गारवा अंगाला जाणवला. दूर कुठेतरी पाण्याचा प्रचंड आवाज घुमत होता. अंधारात चाचपडत आम्ही कॅम्पिंग साईटवर पोहोचलो. कंपनीचा संचालक जीत सिंग तिथे स्वागताला हजर होता. तिथल्या आदिवासी सहाय्यकांनी ढोल वाजवून आणि हातात रानफुले देऊन सगळ्यांचे स्वागत केले. इथल्या लोकांनी “अतिथी देवो भव” फारच मनावर घेतलेले दिसत होते. त्यांच्या स्वागताच्या पद्धती कितीही छान असल्या तरी त्यांना छान म्हणण्याइतकेही त्राण आता अंगात उरले नव्हते. आता मात्र झोप अनावर होत होती. एकदाची तंबूत बॅग टाकली आणि निद्राधीन झालो.            
क्रमशः