मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग १० - पडावली आणि मितावली

ग्वाल्हेरच्या बाहेरील ऐतिहासिक स्थळभेटीतला माझा पुढचा थांबा होता गढी पडावली. हेही या परिसरातलं सुंदर मात्र काहीसं दुर्लक्षित ठिकाण. या ठिकाणी दहाव्या शतकात बांधलं गेलेलं एक भव्य शिवमंदिर होतं. मुस्लीम आक्रमकांनी ते पाडून टाकलं. मग तेराव्या शतकात जाट राजांनी मंदिराच्या अवशेषांभोवती तटबंदी उभारून एक किल्ला बांधला. हा किल्ला म्हणजेच गढी पडावली. बटेश्वर मंदिरसमूहापासून हाकेच्या अंतरावर ही गढी आहे. आजूबाजूचा परिसर ASI ने संरक्षित केलेला आहे. मी आत शिरलो तेव्हा दुपारचे बारा वाजत आले होते. वातावरण तसे थंडच होते. बटेश्वरच्या तुलनेत इथे बरीच गर्दी होती. परिसरात शिरताच दृष्टीस पडले गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार. संपूर्ण इमारत वीसेक फूट उंच चौथऱ्यावर होती. वर चढायला रुंद पायऱ्या होत्या. एका बाजूला सिंह तर दुसऱ्या बाजूला सिंहीण अशा दोन महाकाय शिल्पाकृती होत्या. त्या शिल्पांमुळे त्या प्रवेशद्वाराला एक वेगळाच शाही थाट लाभला होता. असे म्हणतात की मूळ सिंहशिल्पे ग्वाल्हेरच्या वस्तूसंग्रहालयात आहेत. इथे ठेवलेली शिल्पे म्हणजे प्रतिकृती आहेत. काळाच्या एवढ्या आघातांनंतर मूळ शिल्पे कुठेतरी जपून ठेवलेली आहेत हे ऐकून मला जरा हायसं वाटलं. अनेक पर्यटक त्या शिल्पांच्या शेजारी सेल्फी काढत होते. 

गढी पडावलीचे भव्य प्रवेशद्वार आणि तेथील सिंहशिल्पे 

मुखमंडपाचे कोरीव स्तंभ 
पायऱ्या चढता चढता दम लागत होता. चौथराच इतका उंच तर मूळ मंदिर किती उंच असेल! वर पोहोचलो आणि दृष्टीस पडला आधीच्या मंदिराचा मुखमंडप. इथे आधी मंदिर होतं हे सांगणारा एवढाच काय तो पुरावा आज शिल्लक आहे. त्याची रचना बघून खजुराहोच्या मंदिरांची आठवण झाली. नाजूक कोरीवकामाने त्याचा इंच न इंच सजवलेला होता. आतील छतावरचे कोरीवकाम तर थक्कच करणारे होते. एका बाजूला गजलक्ष्मी, दुसरीकडे शिव-पार्वती, तर सर्व बाजूंनी खालच्या ओळीवर रामायणातले प्रसंग अत्यंत कुशलतेने कोरलेले होते. तो मंडप बघून मूळ मंदिर किती भव्य आणि रेखीव असेल याची कल्पना मी करत होतो. नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे येत होते. त्या काळातले हे या प्रदेशातले सर्वांत मोठे मंदिरे असावे. आज जर ते अस्तित्वात असते तर दक्षिणेकडच्या अनेक विशाल मंदिरांना स्पर्धा निर्माण झाली असती. असो. मंडपाच्या पुढे निव्वळ एक चौथरा उरला होता. चोहो बाजूंनी तटबंदी दिसत होती. उजवीकडे जाटांनी बांधलेल्या महालाचे काही अवशेष दिसत होते. वर जाणारा जिना दिसत होता. मी सहज म्हणून वर चढलो. इथून संपूर्ण परिसर नजरेच्या एका टप्प्यात दिसत होता. आजूबाजूला वस्ती फारशी नव्हती. बहुतांश शेतजमीनच दिसत होती. जाटांनी किल्ला बांधायला हे ठिकाण का निवडले असेल याचा प्रश्न मला पडला होता. कदाचित एखाद्या महत्त्वाच्या दळणवळण मार्गावर हे ठिकाण पडत असावे. असो. तिथे थोडे फोटो काढून मी बाहेर पडलो. 

छतावर साकारलेले पुराणातले प्रसंग 

छतावरचे नाजूक कोरीवकाम 

किल्ल्याच्या गच्चीवरून दिसणारे दृश्य 

तिथून मी पोहोचलो मितावलीच्या चौसठ योगिनी मंदिराकडे. आपल्या संसद भवनाशी साधर्म्य साधणाऱ्या या मंदिराच्या गोलाकार रचनेमुळे असे म्हटले जाते की संसद भवनाच्या स्थापत्यविशारदाने या मंदिरापासून प्रेरणा घेतली. तर हे मंदिर बघण्यासाठी मी कमालीचा उत्सुक होतो. मितावली गावाच्या जवळ पोहोचलो तशी लहानशी टेकडी दिसू लागली. गाव तर अगदीच लहान होतं. गाव कसलं, लहानशी वस्तीच म्हणा. टेकडीखाली दोन-चारच गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. रविवार असूनही इथे तुरळकच गर्दी होती. वर जायला पायऱ्या बांधलेल्या होत्या. मी वर चढू लागलो. आभाळ झाकोळून आलं होतं. पाऊस पडेल की काय असं वाटत होतं. दहा मिनिटातच मी वर पोहोचलो. समोरच गोलाकार आकारात बांधलेलं मंदिर दिसत होतं. अपेक्षेपेक्षा हे मंदिर लहानच वाटत होतं. त्याला ना कळस होता ना मंडप. आणि बाहेरील भिंतीवर काहीच विशेष कोरीवकाम नव्हते. एका बाजूला प्रवेशद्वार होते. तिथून मी आत शिरलो. आतले दृश्य मात्र थक्क करणारे होते. मधोमध गोलाकार गाभारा होता. त्यात एक शिवलिंग होते. त्याच्या बाजूने गोलाकार असा एक लहानसा मंडप होता. त्याचे खांब साधेच पण सुबक होते. त्याच्या बाजूने एक गोलाकार प्रांगण होते. बाहेरील भिंतीच्या आतल्या बाजूने पाच-सहा फूट उंच असा चौथरा होता. त्यावर एकसारखे असे चौसष्ठ कोनाडे होते. या कोनाड्यांत चौसष्ठ योगिनींच्या मूर्ती असत. मात्र सध्या तरी यांपैकी कोणतीही मूर्ती अस्तित्वात नाही. त्यांच्या जागी शिवलिंगे स्थापलेली आहेत. अनेक शिवलिंगे असल्यामुळे या मंदिरास इकत्तरसौ महादेव मंदिर असेही म्हणतत. एकंदरीत ही जागा एकदमच वेगळी होती. 

प्रथमदर्शनी अगदीच अनाकर्षक वाटणारे चौसठ योगिनी मंदिर 

आत शिरताच दिसणारा गोलाकार गाभारा 

चौसष्ठ कोनाडे 

हे मंदिर कच्छप राजा देवपाल याने अकराव्या शतकात बांधले. असे म्हणतात की त्या काळी सूर्याच्या अयन रेषेच्या आधाराने गणित आणि खगोलशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासाठी या मंदिराच्या वास्तूचा प्रयोग केला जाई. त्या काळी तंत्र परंपरेचा मोठा प्रभाव होता. या परंपरेचे साधक चौसष्ठ योगिनींची पूजा करत. योगिनींची पूजा करणारा हा संप्रदाय कमालीच्या गुप्ततेत असे. आजच्या घडीला या परंपरेचे कोणी उपासक अस्तित्वात आहेत की नाही याची काहीच कल्पना नाही. त्यांचे विधी, पूजा-अर्चा इत्यादींविषयी बाहेरील माणसाला कोणती माहिती मिळणे दुरापास्त. त्यामुळे या मंदिराविषयीही फार काही माहिती उपलब्ध नाही. किंबहुना १९४० पर्यंत हे मंदिर गुलदस्त्यातच होते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात ग्वाल्हेर संस्थानात केल्या गेलेल्या अनेक शोध मोहिमांत कुठेच याचा उल्लेख सापडत नाही. संसद भावनाचे स्थापत्यकार एडविन लट्यंस आणि हर्बर्ट बेकर यांनी कधी इथे भेट दिल्याचाही पुरावा नाही. त्यामुळे संसद भवन या मंदिरावरून प्रेरणा घेऊन बांधले असल्याची कथा निव्वळ कल्पनाविलास ठरतो. असो. आतमध्ये थोडेफार फोटो काढून मी बाहेर पडलो. बाहेरच्या बाजूला एका लहानशा चौथऱ्यावर एक विष्णूचे मंदिर होते. इथून आजूबाजूचा सुंदर देखावा दिसत होता. जमिनीच्या लहानमोठ्या चौकोनी तुकड्यांत शेती डवरलेली दिसत होती. मी काही क्षण तिथे विसावलो. 

भव्य गोलाकार प्रांगण 

बाहेरचे लहानसे विष्णू मंदिर 

मध्य प्रदेशातल्या माझ्या सहलीचा हा शेवटचा थांबा होता. खजुराहोपासून सुरु झालेला हा प्रवास मितावलीला संपत होता. या सहलीत स्थापत्यकलेचा हात धरून जणू इतिहासाचीच मुशाफिरी मी केली होती. प्राचीन काळातली खजुराहोची मंदिरे, मग मध्ययुगात उभारले गेलेले ओरछातले महाल, ग्वाल्हेरमधला आधुनिक काळात पाश्चिमात्य आणि भारतीय शैलींचा मिलाफ घडवत बांधला गेलेला जय विलास महाल, आणि आता प्राचीन काळात बांधलेली, पण जमीनदोस्त झालेली, आणि आधुनिक तंत्रज्ञानाने पुन्हा उभारलेली बटेश्वरची मंदिरे. काळाचे एक आवर्तन पूर्ण झाल्यासारखे वाटले. माणसे मर्त्य असतात. पण कला अमर्त्य असते. श्रद्धा अमर्त्य असते. एखाद्या गोष्टीत जीव गुंतवून ती पूर्णत्वास नेणारी जिद्द अमर्त्य असते. अशा अमर्त्य विचारांचे मूर्त स्वरूपच मी या सहलीत अनुभवले होते. अनुभवांची पोतडी थोडी अजूनच श्रीमंत झाल्यासारखी वाटत होती. भरल्या मनाने मी त्या टेकडीवरून खाली उतरलो. वाटेत जेवण उरकून विमानतळाकडे रवाना झालो. मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पुढच्या सहलीचे नियोजन सुरु झाले होतेच!

टेकडीवरून खाली डवरलेली शेते दिसत होती

समाप्त 

मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग ९ - बटेश्वर मंदिर समूह

आज सहलीचा शेवटचा दिवस होता. आजचा दिवस ठरवला होता ग्वाल्हेरच्या उत्तरेकडील मोरेना जिल्ह्यातील बटेश्वर, गढी पडावली, आणि मितावली या ऐतिहासिक जागांसाठी. या सर्व जागा मुख्य गावांपासून दूर, आडवाटेवर आहेत. तिथे पोहोचायला कोणतीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. शिवाय या जागा बघून थेट विमानतळावर जायचे होते. मग संपूर्ण दिवसभरासाठी एक टॅक्सी बुक केली. ठरल्याप्रमाणे साडेसात वाजता टॅक्सीवाला हॉटेलवर हजर झाला. चेक आउट करून मी निघालो. आज वातावरण जरा ढगाळ होते. पाऊस पडेल असे वाटत होते. मधूनच उन्हाची एखादी तिरीप झेपावत होती. गार वारा सुटला होता. रोड ट्रीप साठी एकदमच मस्त वातावरण होतं. चालकही गप्पिष्ट होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही चाललो होतो. 

पुनर्स्थापित केलेली मंदिरे 

पहिला थांबा होता बटेश्वर मंदिर समूह. इथे साधारण सातव्या ते आठव्या शतकात गुर्जर प्रतिहार राजवटीत बांधली गेलेली सुमारे २०० मंदिरे आहेत. तेराव्या शतकात ही मंदिरे सम्पूर्ण जमीनदोस्त झाली. त्याचे कारण नक्की मुस्लीम आक्रमणे होते की भूकंप हे नक्की सांगता येत नाही. मात्र एकोणिसाव्या शतकात जेव्हा ही जागा पुन्हा निदर्शनास आली तेव्हा इथे दगडांचा नुसता ढिगारा होता. २००५ मध्ये के के मुहम्मद या ASI च्या अधिकाऱ्याने या मंदिरांची पुन्हा उभारणी करण्याचा विडा उचलला. तेव्हा हा सगळा भाग चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांच्या हातात होता. मुळातच हा भाग कित्येक दशकांपासून दरोडेखोरांसाठी कुप्रसिद्ध होता. मात्र मुहम्मद यांनी त्यांच्या म्होरक्याला हे समजावले की मंदिरे त्यांच्या पूर्वजांनी बांधलेली आहेत. मग तो पुनर्स्थापनेस मदत करण्यास राजी झाला. त्याच्या लोकांनी या कामात मदतही केली. पुढच्या काही वर्षांत मुहम्मद यांच्या चमूने एखादे प्रचंड जीग्सौ पझल सोडवावे तसे एक-एक दगड वेगळा काढून, त्याची मूळची जागा शोधून काढून, साधारण पन्नास-एक मंदिरे पुन्हा उभारली. हे सारे काम निश्चितच प्रशंसनीय होते. आज ही सारी मंदिरे गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभी आहेत. असा इतिहास बघता ही जागा पाहण्यास मी फारच उत्सुक होतो.

पुजारी काकांच्या झोपडीजवळून दिसणरे दृश्य 

मंदिराच्या कळसावर बसलेला मोर 
ग्वाल्हेरहून तासाभरात मी तिथे पोहोचलो. परिसरात फारसे कुणी पर्यटक नव्हते. त्यामुळे तिथे शांत आणि प्रसन्न वाटत होतं. वालुकाश्मात घडवलेली मंदिरे ढगांतून झिरपत येणाऱ्या प्रकाशात गूढ वाटत होती. मी कॅमेरा काढला आणि फोटो काढू लागलो. मंदिरांच्या आजूबाजूला असंख्य अवशेष विखुरलेले होते. कोणता भाग कुठे लावायचा हे कसे काय ठरवले असेल ASI च्या लोकांनी याच अचंब्यात मी इकडेतिकडे फिरत होतो. ही मंदिरे भारतात इतरत्र आढळणाऱ्या मंदिरांपेक्षा एकदम वेगळी आहेत. प्रत्येक मंदिर म्हणजे एखाद्या मोठ्या मंदिराची लहान आणि सोपी प्रतिकृती. एक चौरसाकृती चौथरा, त्यावर चार भिंती, वर कळस, आणि मध्यभागी देवाची मूर्ती. एकूण उंची केवळ १०-१२ फूट. बहुतांश मंदिरे शिवाची असून काही मंदिरे विष्णू आणि शक्तीची देखील आहेत. मंदिरांवर नटराज, सप्तमातृका, शिव-पार्वती विवाह, विष्णू दशावतार, मैथुनमग्न व्यक्ती, योद्धे, अशा अनेक आकृती कोरलेल्या आहेत. या समूहातले मुख्य मंदिर म्हणजे भूतेश्वर मंदिर. हे एक मोठे पंचरथ मंदिर आहे. जेव्हा सगळी मंदिरे उद्ध्वस्त झाली होती तेव्हा हे एकाच मंदिर थोडेफार बऱ्या अवस्थेत होते. त्याच्या नावावरूनच या समूहाला बटेश्वर किंवा बाटेसर म्हणतात. हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा थोडे मोठे होते. मुख्य मंदिर आणि त्याची दहा उपमंदिरे अशी त्याची रचना होती. मंदिरांच्या मागेच एक लहानशी टेकडी होती. आजूबाजूला बरीच घनदाट झाडी होती. मध्येच मोराचे केकारव ऐकू येत होते. आवाजाचा मागोवा घेतला तर एका मंदिराच्या कळसावर पक्षिराज मोठ्या दिमाखात बसलेला दिसला. तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात मी गुंगून गेलो. 


एकसारख्या पद्धतीने बांधलेली मंदिरे 
तेवढ्यात तिथल्या एका मंदिरातून एक वयस्क पुजारी बाहेर येताना दिसले. इथे पूजा-अर्चाही होते हे बघून मला आश्चर्य वाटलं. मी उगाच त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. हे पुजारी काका मंदिरांच्या परिसरातच एका झोपडीत रहात होते. मला मंदिरांच्या कथेत रस आहे हे पाहून त्यांनी त्यांच्या झोपडीतून एक जाडजूड अल्बम काढला. त्यात ASI ने केलेल्या कामाचा फोटोग्राफिक तपशील होता. मला तर खजिनाच हाती लागल्यासारखे झाले. बराच वेळ मी तो अल्बम चाळत बसलो. पुजारी काका तिथले बारीकसारीक किस्से ऐकवत होते. 

इतक्यात जवळच्या कुठल्याशा शाळेची मुलं एकदम गलका करत मंदिरांच्या आवारात शिरली. मंदिरांच्या भिंतींत त्यांचा आरडाओरडा, पकडापकडी वगैरे सुरु झालं. सोबत आलेले शिक्षक एका कोपऱ्यात बसून गप्पा मारत होते. मला ते सगळं दृश्य बघून अक्षरशः संताप आला. मुलंच ती. कुठेही गेली तरी खेळणारच. मग इतक्या लहान मुलांना अशा ठिकाणी आणावं तरी का? एखाद्या जागेचं पावित्र्य जपणं वगैरे समजण्याचं त्यांचं वय आहे का? पण मग त्यांना आपल्या वारशाची ओळख तरी कशी होणार? मुलांना हे सगळे समजावून सांगणे शिक्षकांचे काम नाही का? उगीच माझ्या डोक्यात विचारमंथन सुरु होतं. शेवटी एका शिक्षकाला मी जाऊन सुनावलं. बिचारा शिक्षक सगळ्या पोरांना गोळा करून निघून गेला. पुजारी काका नुसते माझ्याकडे बघत हसत होते. त्यांच्यासाठी हा रोजचाच प्रकार असेल म्हणा. मुलांना निदान दटावता तरी येतं. मोठी माणसं अशी वागत असतील तर काय करावे? असो. या सगळ्यात वेळ कसा गेला कळलेच नाही. खजुराहोपेक्षा जुनी असूनही या मंदिरांना तेवढी प्रसिद्धी लाभलेली नाही. स्थानिक पर्यटकांशिवाय इथे फारसं कुणी फिरकत नाही. निधीअभावी पुनर्स्थापनेचं काम रखडलेलं आहे. या जागेला पुढच्या काळात बरे दिवस यावेत अशी प्रार्थना करून, पुजारी काकांना थोडीफार दक्षिणा देऊन, आणि परिसरात अजून थोडी फोटोग्राफी करून मी तिथून निघालो.  

ढगाळ आकाशाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अजूनच सुंदर दैत होती 

क्रमशः 

मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग ८ - ग्वाल्हेर - सास बहु मंदिर आणि इतर वास्तू

गोपाचाल पर्वत म्हणजे ग्वाल्हेर शहराच्या मधोमध स्थित असलेला एक खडकाळ डोंगर. ग्वाल्हेरचा सुप्रसिद्ध किल्ला, त्यातले प्रेक्षणीय महाल, काही मंदिरे, आणि जैन शिल्पे याच डोंगरावर आहेत. मन मंदिर महाल आणि किल्ल्याचा मुख्य दरवाजा पाहून आम्ही आलो सास-बहु मंदिराकडे. नावावरून वाटेल हे मंदिर सासू-सुनेचे आहे की काय. पण प्रत्यक्षात हे नाव म्हणजे सहस्रबाहूचा अपभ्रंश आहे. मंदिराचा बराचसा भाग नष्ट झालेला आहे. शिल्लक अवशेष म्हणजे मंडपाचा भाग असावा. बाहेरून इतक्या सुबक दिसणाऱ्या मंदिराची आतली कलाकुसर किती विलक्षण असेल या उत्सुकतेने आम्ही आत शिरलो. मंदिराची शैली थोडीफार खजुराहोच्या शैलीशी मिळती-जुळती होती. खांबांवरचे नाजूक कोरीवकाम, मुखमंडपाची द्विस्तरीय रचना, आणि गोलाकार छत अगदीच अचंबित करणरे होते. कलत्या उन्हाची एक तिरीप कुठल्याशा झरोक्यातून आत रेंगाळत होती. पिवळ्या वालुकाश्मावरून परावर्तित झाल्याने तिथे छाया-प्रकाशाचा एक अद्भुत परिणाम घडून येत होता. मला तर कुठल्याशा वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटत होते. गाभाऱ्याच्या द्वारावर अत्यंत नाजूक कोरीवकाम केलेले होते. तिथे बरेच फोटो काढले आणि बाहेर पडलो. शेजारीच दुसरे एक लहान मंदिर होते. हे मंदिर म्हणजे एका मोठ्या मंदिराचा मुखमंडप असावा. ग्वाल्हेर शहराच्या पार्श्वभूमीवर हे लहानसे सुबक मंदिर उठून दिसत होते. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. त्यामुळे तिथे फार वेळ न घालवता आम्ही पुढे निघालो. 

सहस्रबाहू मंदिर 

सहस्रबाहू मंदिराच्या शेजारील लहान मंदिर 

मंदिरात रेंगाळणारी उन्हाची तिरीप 

तिथून पुढे आम्ही पोहोचलो ‘तेली का मंदिर’ या मंदिराकडे. हे मंदिर म्हणजे असाधारण वास्तुकलेचा नमुना आहे. उत्तर भारतीय नागरी आणि दक्षिण भारतीय द्राविडी वास्तुकलेचे मिश्रण यात मंदिरात दिसते. मंदिराची रचना इतर मंदिरांसारखी चौरसाकृती नसून आयताकृती आहे. मंदिराचे शिखर जवळपास ८० फूट उंच असून एखाद्या दाक्षिणात्य मंदिराच्या गोपुरासमान भासते. मंदिराचा बराचसा भाग ढासळलेला आहे. काही इतिहासकारांच्या मते इसवी सनाच्या आठव्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर म्हणजे गुप्तोत्तर कालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा मंदिर बंद व्हायची वेळ आली होती. दहा मिनिटात बाहेर येतो असे म्हणून आम्ही आत शिरलो. एकसलग उभट रचना असलेले हे मंदिर उत्तर भारतातल्या इतर मंदिरांपेक्षा निश्चितच वेगेळे भासत होते. मुखमंडप, अर्धमंडप गाभारा, असे कोणतेच भाग ओळखू येत नव्हते. भिंतींवर निव्वळ भौमितिक आकार आणि पानाफुलांची नक्षी होती. प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूंना काही मूर्ती होत्या, पण त्यासुद्धा गंगा-जमुना किंवा जय-विजय यांच्या वाटत नव्हत्या. मंदिर नियमित पूजेत नसल्याने आतमध्ये फारशी स्वच्छता नव्हती. मग आम्ही बाहेरूनच एक प्रदक्षिणा घातली. कलत्या उन्हाच्या सोनेरी प्रकाशात मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते. थोडेफार फोटो काढून आम्ही तिथून बाहेर पडलो. 

तेली का मंदिर चा उत्तुंग कळस 
तेली का मंदिर ची असाधारण उभट रचना 

आशिषला किल्ल्यावरची एक खास जागा माहित होती जिथून सुंदर सूर्यास्त पाहता येतो. आम्ही लगेचच तिथे निघालो. ही जागा म्हणजे किल्याचा एक पडका बुरुज होता. आसपास फारसं कुणी नव्हतं. समोर अथांग पसरलेलं शहर दिसत होतं. बुरजाच्या दोन्ही बाजूंनी किल्ल्याची तटबंदी दिसत होती. इथून डोंगरकडा इतका तीव्र होता की या बाजूने कोणी चढाई करणं निव्वळ अशक्य. एका बाजूने सहस्ररश्मी लालबुंद होऊन डोंगराआड चालला होता. सारा आसमंत त्याच्या केशरी प्रभेने उजळला होता. नेमकी कॅमेऱ्याची बॅटरी संपलेली! मग फोनच्या कॅमेऱ्यावरच थोडेफार फोटो काढले. तसं म्हणायला सूर्यास्त ही तर रोजचीच बाब. पण तरीही प्रत्येक सूर्यास्त वेगळा असतो. सूर्याची छटा वेगळी असते. ढगांचे आकार वेगळे असतात. आकाशाचा रंग वेगळा असतो. त्यात विशिष्ट पार्श्वभूमीची सोबत असली की त्या सूर्यास्ताला एक वेगळेच रुपडे मिळते. मग कच्छच्या रणातला सूर्यास्त वेगळा नि कन्याकुमारीच्या भूशिरावरचा सूर्यास्त वेगळा. दिवस आणि रात्रीतले हे स्थित्यंतर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून पहावे. त्याला तिथल्या भूगोलाचे आणि संकृतीचे अलंकार जडलेले असतात. ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरचा तो सूर्यास्तही असाच तिथल्या मातीत मळलेला होता. तिथल्या जाज्वल्य इतिहासाची गाथा मोठ्या आस्थेने सांगत होता. आम्ही शांतपणे आसमंताचे हळूहळू बदलत जाणारे रंग न्याहाळत बसलो होतो. आता हवेतला गारठा वाढू लागला होता. पूर्ण अंधार व्हायच्या आत शहर गाठावे म्हणून आम्ही तिथून निघालो. 

डोंगराआड जाणारा सूर्य 

अथांग पसरलेले ग्वाल्हेर शहर 

अजानबाहू तीर्थंकर 
आमचा पुढचा थांबा होता सिद्धाचल गुंफा. उर्वाई गेटच्या रस्त्यावर डोंगरकड्यात कोरलेल्या जैन लेण्यांचा हा एक समूह आहे. सातव्या ते पंधराव्या शतकांदरम्यान घडवल्या गेलेल्या या लेण्या म्हणजे २४ जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. काही मूर्ती पद्मासनातल्या तर काही उभ्या आहेत. लेण्यांचा परिसर बराच मोठा होता. सूर्यास्त होऊन गेल्याने बहुतांश गुंफा बंद झालेल्या होत्या. सुरक्षारक्षकाला विनंती करून मी समोरच्याच मुख्य लेण्यांकडे निघालो. संधीप्रकाशात तीर्थंकरांच्या भावमुद्रा अजूनच गंभीर भासत होत्या. बऱ्याचशा मूर्तींचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. मुघल सत्तेचा परिपाक, दुसरे काय! चेहरा विद्रूप झालेला असला तरी ते अनावृत्त अजानबाहू शरीर शांततेचा संदेश देत तसेच अनासक्त उभे होते. अशाच खडकाळ लेण्यांतून या तीर्थंकरांच्या अनुयायांनी त्यांचा संदेश देशभर नेला. कितीही वार झाले तरी नष्ट न होण्याचे सामर्थ्य त्या विचाराला या लेण्यांनी दिले. लेण्या पाहता पाहता इतिहासरंजनात गुंग झालेला मी आशिषच्या हाकेने भानावर आलो. अंधार आणि गारठा दोन्ही वाढत चालले होते. 

सिद्धाचल गुंफा 

पद्मासनस्थित तीर्थंकर 

आम्ही शहरात परत येऊन छान गरमागरम चहा घेतला. जरा तरतरी आली. आशिषला आता काही कामासाठी जायचे होते. त्याला अनेक धन्यवाद देऊन मी त्याचा निरोप घेतला. ग्वाल्हेरच्या मध्यवर्ती भागात गजक खरेदी करून मी हॉटेलवर परतलो. ग्वाल्हेरच्या वैभवशाली इतिहासाचे ओझरते दर्शन आणि आशिषची सोबत यांमुळे दिवस मस्त गेला होता. लवकरच जेवण आटोपले आणि झोपी गेलो.       

क्रमशः 

मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग ७ - ग्वाल्हेर - जय विलास महाल आणि ग्वाल्हेरचा किल्ला

ओरछाहून सकाळी लवकरच निघालो. तिथून झाशी साधारण १३ किमी आहे. अर्ध्या-पाउण तासातच झाशी रेल्वे स्थानकात पोहोचलो. इथून ग्वाल्हेरला जायला बऱ्याच गाड्या होत्या. तिकीट खिडकीवर आल्यावर कळलं की मुळातच लेट झालेली एक सुपरफास्ट एक्स्प्रेस लवकरच स्टेशनात शिरते आहे. मग लगेचच तिकीट काढलं. आधीच लेट झालेली ही गाडी अजून लेट न होवो असं म्हणून मी गाडीत चढलो. एखाद्या लांब पल्ल्याच्या गाडीच्या जनरल डब्यातून जायचा माझा पहिलाच अनुभव असावा कदाचित. बसायला जागा नव्हतीच. समोर एक तरुण बसला होता. माझ्या गळ्यातल्या कॅमेऱ्याकडे निरखून बघत होता. त्याने थोडंसं सरकून बसायला जागा करून दिली. मी सहज महणून त्याला विचारू लागलो, गाडी किती वाजता पोहोचेल, कायमच लेट असते का, वगैरे. मग ओळख-पाळख झाली. तर हा तरुण, आशिष, मुळचा ग्वाल्हेरचा. सध्या कुठल्याशा कंपनीत एच आर म्हणून काम करत होता. फोटोग्राफी करायचा थोडीफार. आवड-निवड जुळली की गप्पागोष्टी सुरु होतात. आमची तर लगेच मैत्रीही झाली. मी ग्वाल्हेरला खास फिरायला म्हणून आलो आहे याचे त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते. एकीकडे खास आपलं शहर बघायला कोणी मुंबईकडचा पाहुणा आला आहे याचा आनंदही होत होता. उत्साहात येऊन तो म्हणाला, “मैं आपको शहर घुमाउंगा!” मला तर अगदीच आनंद झाला. एखादं शहर बघायला स्थानिक माणसासारखी दुसरी कोणती सोबत नाही. त्यात आशिषसारखा आपल्या शहरावर मनापासून प्रेम करणारा कोणी असेल तर बातच न्यारी! मग आम्ही संपूर्ण दिवसाचा प्लॅन बनवला. तेवढ्यात ग्वाल्हेर आलंच.     

जय विलास महालाचे प्रवेशद्वार 

महालाचा प्रशस्त परिसर 

हॉटेल स्टेशनच्या जवळच होतं. मी चेक इन केलं, आंघोळ वगैरे उरकली, आणि जेवायला बाहेर पडलो. ऑर्डर दिली आणि गुगलवर सगळ्यात जवळ कोणती प्रेक्षणीय जागा आहे ते शोधू लागलो. ग्वाल्हेर हे मध्य भारतातलं एक महत्त्वाचं शहर. त्याचा इतिहास कित्येक शतके मागे जाणारा. त्यापैकी मध्ययुगातला तोमर राजवटीचा काळ म्हणजे ग्वाल्हेरच्या इतिहासातलं सुवर्णयुग. पुढे अठराव्या शतकात, पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर, महादजी शिंदे (आताचे नाव सिंदिया) या मराठा सरदाराने ग्वाल्हेरचे तख्त मिळवले. त्यानंतर भारत स्वतंत्र होईपर्यंत ग्वाल्हेर हे एक संस्थान म्हणून राहिले. १८५७ च्या उठावात ग्वाल्हेर हे महत्त्वाच्या घडामोडींचा केंद्रबिंदू होते. असा रंजक इतिहास लाभलेल्या या शहरात मन मंदिर महाल, ग्वाल्हेर किल्ला, गोपाचल पर्वत, सास-बहु मंदिर, जय विलास महाल, अशा अनेक प्रेक्षणीय वास्तू आहेत. त्यांपैकी जय विलास महाल माझ्या हॉटेलपासून जवळच होता. 

महालातील देवघर 
जेवण उरकलं आणि जय विलास महालाकडे निघालो. युरोपियन आणि भारतीय स्थापत्यशैलींचे उत्तम मिश्रण असलेला हा महाल जयाजीराव सिंदिया यांनी १८७४ मध्ये बांधला. महालाचा केवळ एक भाग वस्तूसंग्रहालय म्हणून पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. इतर भागात अजूनही सिंदिया कुटुंबियांचे वास्तव्य आहे. तिकीट काढून मी आत शिरलो. मध्यभागी विस्तीर्ण बाग, त्यात एक कारंजे, चारही बाजूंनी सममितीत बांधलेली गोथिक शैलीतली पांढरी शुभ्र इमारत, सारे अगदी युरोपातल्या एखाद्या समर पॅलेससारखी भासत होती. सज्जे मात्र भारतीय शैलीत सुशोभित केलेले होते. अधूनमधून डोकावणारे घुमट खास मध्ययुगीन भारतीय शैलीचा आभास निर्माण करत होते. आतील दालनांत सिंदिया घराण्याचा इतिहास, त्यांच्या वापरातल्या वस्तू, त्यांचे दिवाणखाने, वगैरे गोष्टी सुबकतेने मांडल्या होत्या. त्या महालातले देवघर म्हणजे आपल्या टू-बी-एच-के फ्लॅट एवढं मोठं होतं! घराण्याची श्रीमंती आणि राजांची कलासक्तता त्यातून भरभरून दिसून येत होती. या महालातले सर्वात उल्लेखनीय दालन म्हणजे दरबार हॉल. हे दालन म्हणजे अक्षरशः भव्यदिव्य होतं. मोठाले डायनिंग टेबल, नाजूक कोरीवकाम केलेल्या खुर्च्या, छतावरची सुरेख सोनेरी चित्रे, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मध्यभागी असलेले महाकाय झुंबर! मी पाचेक मिनिटं नुसता पाहतच राहिलो. काय श्रीमंती होती या देशात कधी काळी! मग उगीच वैभवशाली इतिहास आणि अस्वस्थ करणारे वर्तमान असे विचार मनात रुंजी घालू लागले. तेवढ्यात आशिषचा फोन आला. तो अर्ध्या तासात भेटणार होता महालाच्या बाहेर. मग थोडेफार फोटो काढून तिथून बाहेर पडलो. 

जय विलास महालातील दिवाणखाना 

दरबार दालनातील महाकाय झुंबर 

ठरल्याप्रमाणे आशिष त्याची स्कूटर घेऊन हजर होता. सुरुवातीलाच आम्ही गोपाचल पर्वतावरील ग्वाल्हेरच्या किल्ल्याकडे निघालो. हा किल्ला म्हणजे भारतातल्या काही सर्वात प्रेक्षणीय किल्ल्यांपैकी एक. मुघल सम्राट बाबरने म्हटल्याप्रमाणे हा किल्ला म्हणजे हिंदुस्तानातील किल्ल्यांच्या माळेतील एक मोती आहे! आम्ही स्कूटर पार्क केली आणि किल्ला भटकायला निघालो. किल्ल्याचा आवार प्रचंड मोठा होता. इथले प्रमुख आकर्षण म्हणजे मन मंदिर महाल. महालाचे नेटके बुरुज दुरूनच खुणावत होते. इथल्या भिंतीवर घडवलेले रंगीत नक्षीकाम आणि प्राण्या-पक्ष्यांच्या आकृती महालाचे वेगळेपण दर्शवत होत्या. आत शिरलो आणि एकापेक्षा एक सरस दालने दिसू लागली. मध्यवर्ती भागातले प्रांगण तर फारच सुंदर होते. प्रत्येक खांबावर आणि सज्ज्यावर नाजूक कोरीवकाम केलेले होते. महालातले गोल तळघर आणि तिथली ध्वनीक्षेपण यंत्रणा एकदमच इंटरेस्टिंग होती. 

मन मंदिर महालाचे बुरुज आणि तटबंदी 

भिंतींवरील सुरेख नक्षीकाम 

ग्वाल्हेरचे ट्रेड मार्क दृश्य 
महाल आतून फिरून झाल्यावर आम्ही बाहेरच्या व्यू पॉइंट वर आलो. इथून एका बाजूला अवघे ग्वाल्हेर शहर दिसत होते तर दुसऱ्या बाजूला मन मंदिर महालाची सुरेख तटबंदी. इथले दृश्य म्हणजे जणू ग्वाल्हेरचा ट्रेडमार्क! हलका वारा सुटला होता. दुपारची वेळ असली तरी इथे डोंगरावर गारठा जाणवत होता. आम्ही थोडा वेळ तिथे टेकलो. प्रकाश विरुध्द दिशेने होता. पण या जागी फोटो नाही काढून कसं चालेल? तिथून जवळच महालाचे मुख्य द्वार होते. याची रचना तर अफाट होती. दोन बाजूंनी उत्तुंग मनोरे, मधल्या भागात एक निरीक्षण सज्जा, कमानीच्या आकाराचा प्रचंड दरवाजा, आणि भिंतींवर रेखाटलेले सुरेख नक्षीकाम, सारेच अद्भुत होते. इथे थोडीफार फोटोग्राफी करून आम्ही किल्ल्याच्या इतर भागाकडे वळलो. मन मंदिर महालाच्या मागच्या बाजूला गुजरी महाल, कर्ण महाल, विक्रम महाल असे अजूनही काही महाल आहेत. यांपैकी काही महाल चांगल्या अवस्थेत आहेत तर काही अगदीच जीर्णावस्थेत. तिथे एक फेरफटका मारला आणि मंदिरांकडे वळलो. 

मन मंदिर महालातील नाजूक नक्षीकाम 

किल्ल्यावरचे इतर काही महाल 

किल्य्यावर येणारा मार्ग 

महाकाय प्रवेशद्वार  
क्रमशः 

मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग ६ - ओरछा - एक लपलेले स्थापत्यरत्न - उपभाग २

चतुर्भुज मंदिर हे राजा मधुकर शाह याने सोळाव्या शतकात बांधले. राम राजा मंदिरातली रामाची मूर्ती खरे तर इथे स्थापित व्हायची होती. मात्र ते काही होऊ शकले नाही. म्हणून आजमितीस इथे राधा-कृष्णाची मूर्ती स्थापित केलेली आहे. या मंदिराची रचना काहीशी एखाद्या चर्चसारखी आहे. प्रचंड उंच दालन, चार बाजूंनी चार उंच मनोरे, त्यावर चढायला गोल जिने, मध्यवर्ती भागात उंच सुशोभित खिडक्या, अशी रचना भारतातल्या इतर मंदिरांत सहसा आढळत नाही. या मंदिराचे चार मनोरे म्हणजे विष्णूचे चार हात अशी संकल्पना होती. या चार मनोऱ्यांपैकी एक मनोरा अपूर्ण आहे. असे म्हणतात, या मनोऱ्याचे बांधकाम सुरु असताना महाराणीच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे बांधकाम अर्धवटच राहिले. एकंदरीत या मंदिराची रचना एकदमच वेगळी आहे. त्यामुळे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे एक विशेष औत्सुक्याचा विषय आहे. असो. 

चतुर्भुज मंदिराचे प्रवेशद्वार 
दमछाक करणाऱ्या पायऱ्या चढून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. कमळाच्या आकृतींनी सजवलेल्या प्रचंड द्वारातून आम्ही आत शिरलो. इथल्या भिंती स्थानिकांनी विद्रूप केल्या होत्या. ते बघून विषण्ण वाटले. तेवढ्यात एक पुजारी वजा गाईड धावत आला. गळ्यात कॅमेरे लटकवलेले दोन तरुण म्हणजे त्याला चार पैसे कमवायची नामी संधी वाटली असावी. गोल जिन्यावरून गच्चीपर्यंत नेतो असे म्हणून त्याने आम्हाला पटवले. आधी पाचशे म्हणत होता. शेवटी शंभर रुपये द्यायचे ठरले. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. मंदिराच्या उंच दालनांमुळे हलका आवाजही घुमत होता. न हलणाऱ्या रामाच्या मूर्तीची कथा या गाईडकडून पुन्हा एकदा ऐकली. आम्ही मुळात उत्सुक होतो गच्चीवर जाण्यात. एका मनोऱ्याच्या जिन्यावरून आम्ही वर चढू लागलो. हे सगळे खरेच एखाद्या चर्चसारखे वाटत होते. मधल्या सज्ज्यावर चार बाजूंना चार सुशोभित गवाक्षे बांधली होती. त्यांपैकी एक गवाक्ष थेट राधा-कृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घडवत होते. तिथून मग आम्ही गच्चीवर पोहोचलो. कुठलाच कठडा नसलेली ही गच्ची काहीशी असुरक्षितच होती. मात्र संपूर्ण शहराचा अप्रतिम देखावा इथून दिसत होता. विशेषतः समोरचा जहांगीर महाल अगदीच उठून दिसत होता. इथे एक मुख्य शिखर, एक उपशिखर, आणि त्याच्या पुढे मशीदीवर असतो तसा एक घुमट दिसत होता. मंदिराच्या स्थापत्यविशारदाने नक्की काय विचार करून अशी स्थापत्यघटकांची सरमिसळ केली असेल देव जाणे! पण त्यातून घडलेले स्थापत्यरत्न अद्भुत होते एवढे नक्की!

चतुर्भुज मंदिराच्या गच्चीवरील मनोरे 

चतुर्भुज मंदिराची गवाक्षे 
चतुर्भुज मंदिर पाहून आम्ही बाहेर पडलो तेव्हा दुपारचे दोन वाजत आले होते. मग आम्ही आधी जेवण करायचे ठरवले. विदेशी पर्यटकांच्या वर्दळीमुळे इथे काही उत्तम सेवा देणारी उपहारगृहे चालू झाली आहेत. आम्ही त्यांपैकीच एका ठिकाणी जेवण उरकले आणि लक्ष्मी-नारायण मंदिराकडे निघालो. हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागापासून काहीसे दूरवर एका टेकडीवर होते. उन्हं बरीच तापली होती. हिवाळ्याचे दिवस असले तरी दुपारचं ऊन चांगलंच चटका देत होतं. अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. हे मंदिर म्हणजे स्थापत्यशैलीचा आणखीन एक वेगळा नमुना होतं. 


मंदिराची तटबंदी 
प्रथमदर्शनी तर ती वास्तू एक किल्लाच वाटत होती. चार बाजूंनी उंच संरक्षक भिंती, कोनांवर बुरुज, तटबंदीवर तोफांसाठी भोकं, असे एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखे मंदिराचे रूप होते. मध्यभागी एक उंच मनोरा होता. हा मनोरा म्हणजेच मुख्य शिखर. मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आत शिरलो. गाभाऱ्याच्या चारही बाजूंनी विस्तृत आयताकृती दालने होती. त्यांच्या भिंतींवर आणि छतांवर सुरेख चित्रे काढलेली होती. यातील बरीचशी चित्रे रामचरितमानस या साहित्यकृतीवर बेतलेली होती. काही चित्रे राजामहाराजांची होती. एका बाजूने मुख्य मनोऱ्यावर जाणारा जिना होता. इथेही वर चढताना एखाद्या चर्चचा आभास होत होता. गच्चीवरून थोडेफार फोटो काढून आम्ही शहराकडे परत निघालो. 

दालनामधील सुरेख चित्रकला 

राजामहाराजांची चित्रे 
मंदिराचे मुख्य शिखर/मनोरा 

प्रियांकची जायची वेळ झाली होती. त्याच्यासोबत फिरताना वेळ मस्त गेला होता. त्याला फेसबुकवर अॅड करून त्याचा निरोप घेतला. साधारण साडेतीन वाजले होते. अजून नदीकाठच्या छत्र्या बघायच्या राहिल्या होत्या. पण दिवसभर फिरून फिरून पाय थकले होते. मग गेस्ट हाउसवर जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतली आणि सूर्यास्ताच्या वेळी छत्र्या बघायला निघालो. या छत्र्या म्हणजे बुंदेला राजांच्या समाध्या होत. एकूण चौदा छत्र्या बेतवा नदीच्या काठाने बांधलेल्या आहेत. मी प्रवेशद्वारापाशी पोहोचलो तेव्हा पाच वाजत आले होते. सव्वापाचला तो परिसर बंद व्हायचा होता. तिथला सुरक्षारक्षक आत सोडायला तयारच होईना. मग गयावया करून फोटो काढून लगेच बाहेर येतो असे सांगून मी आत शिरलो. एक चौरसाकृती इमारत, चार कोनांवर चार लहान मनोरे, आणि मध्यभागी उंच असा मुख्य मनोरा, असे प्रत्येक छत्रीचे सर्वसाधारण स्वरूप होते. इथल्या स्थापत्यशैलीवर मुस्लीम शैलीचा जास्त प्रभाव जाणवत होता. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात त्या छत्र्या चमकत होत्या. छत्रीच्या आत किंवा गच्चीवर जायला परवानगी नव्हती. तिथे दोन-चार फोटो काढतोय ना काढतोय तेवढ्यात सुरक्षारक्षक शिट्टी वाजवत आत येताना दिसला. माझा थोडासा हिरमोडच झाला. उगीच विश्रांती घ्यायला गेलो असं वाटलं. हिरमुसून मी बाहेर पडलो. बाजूलाच नदी वाहत होती. नदीवर सुंदर घाट बांधलेला होता. छत्र्यांचा परिसर आता बंद झालेला असला तरी बाहेरून सगळ्या छत्र्या पाहता येत होत्या. किंबहुना घाटावरूनच त्यांचे दृश्य अधिक सुंदर दिसत होते. मग काय, मी कॅमेरा काढला आणि सुटलो. अंधार पडेपर्यंत मनसोक्त फोटो काढले आणि शहराकडे यायला निघालो. येता येता रामराजाचे दर्शन घेतले आणि गेस्ट हाउसवर परतलो. 

ओरछा मधील छत्र्या 

सोनेरी उन्हात चमकणाऱ्या छत्र्या 

छत्र्यांच्या पार्श्वभूमीवरचा रम्य सूर्यास्त 


छत्री जितकी मोठी आणि सुशोभित तितके त्या राजाचे सामर्थ्य मोठे 

एकंदरीत आजचा दिवस मस्त गेला होता. ओरछा मधल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरत्नांचे दर्शन घडल्याने एक वेगळेच समाधान वाटत होते. आता पुढचा मुक्काम होता ग्वाल्हेर. सकाळी लवकरच निघायचे होते. म्हणून लवकर जेवण आटोपले आणि झोपी गेलो.   

क्रमशः 

मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग ५ - ओरछा - एक लपलेले स्थापत्यरत्न - उपभाग १

ओरछातला दिवस उजाडला तो मंदिरातल्या आरतीच्या आवाजाने. शहरातल्या राम राजा मंदिराच्या मागेच तर होतं गेस्ट हाउस. गेस्ट हाउस कसलं, घरच ते. घरातल्याच काही खोल्या हॉटेलच्या रूमसारख्या तयार केल्या होत्या. सुविधा तशा यथातथाच होत्या. पण घरमालक आणि त्याचे कुटुंबीय अगदी उत्तम पाहुणचार करत होते. उठायला तसा उशीरच झाला होता. पटकन आन्हिकं उरकली आणि नाश्ता करायला जवळच्या उपहारगृहावर गेलो. आलू पराठ्याची ऑर्डर दिली आणि बाहेर मांडलेल्या खुर्चीवर येऊन सुस्तावलो. सकाळची आरती करून बाहेर पडलेल्या भाविकांची रस्त्यावर वर्दळ दिसत होती. छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचा बोहनीसाठी कोलाहल चालला होता. उन्हं वर आली होती तरी हवेत बऱ्यापैकी गारठा होता. अमूल बटरवर खरपूस भाजल्या जाणाऱ्या पराठ्याचा खमंग वास दरवळत होता. आता चांगलीच भूक लागली होती. 

गजबजलेला मंदिराचा परिसर 

तेवढ्यात कानावर काही मराठी शब्द पडले. समोरच बसलेला एक तरुण फोनवर मराठीतून बोलत होता. ओरछा मध्ये मराठी पर्यटक बघून जरा आश्चर्यच वाटले. तसा मराठी माणूस बराच फिरणारा असला तरी अशा ऑफ-बीट ठिकाणी तो सहसा दृष्टीस पडत नाही. असो. मी कुतूहलापोटी त्याच्याशी संवाद साधला. ओळख-पाळख झाली. तर हा तरुण, प्रियांक, होता मुळचा डोंबिवलीचा पण सध्या कॅनडामध्ये स्थायिक. इथे जवळच्या एका शहरात कुणाच्या लग्नाला आला होता. बरेच देश फिरलेला होता. प्रवासाची आवड, गळ्यात कॅमेरा, आणि मराठी कनेक्शन. त्यामुळे आमची लगेच गट्टी जमली. मग ओरछाची भटकंती एकत्रच करायची ठरवलं. समविचारी सहप्रवासी भेटल्याने मी खुश होतो. तेवढ्यात गरमागरम आलू पराठा हजर झाला. गप्पा मारता मारता नाश्ता उरकला आणि तिथल्या किल्ल्याकडे रवाना झालो. 


जहांगीर महालाचे प्रवेशद्वार 
ओरछा हे एक बेतवा नदीच्या काठावरचं एक लहानसं शहर. स्थानिक भाषेत त्याचा अर्थ होतो लपलेले. आणि खरंच हे एक लपलेलं स्थापत्यरत्न आहे. सोळाव्या शतकात रुद्रप्रताप या राजपूत राजाने हे शहर वसवले. तीन बाजूंनी विळखा घालणारी बेतवा नदी आणि एका बाजूने घनदाट अरण्य असे नैसर्गिक संरक्षण या शहराला होते. रुद्रप्रताप आणि त्याच्या वंशजांनी पुढची दोनेक शतके इथून बुंदेलखंडावर राज्य केले. त्यांना बुंदेला राजपूत असे संबोधतात. त्यांचे मुघलांशी संबंध कधी सलोख्याचे तर कधी शत्रुत्वाचे होते. दरम्यान त्यांनी या शहरात अनेक उत्तुंग इमारती बांधल्या. जहांगीर महाल, चतुर्भुज मंदिर, लक्ष्मी-नारायण मंदिर, आणि बेतवा नदीकाठावरच्या छत्र्या या त्यांपैकी काही महत्वाच्या इमारती होत. इथली स्थापत्यशैली म्हणजे मूळ भारतीय आणि मुघल शैलींचा मिलाफ समजली जाते. बुंदेला राजांच्या राजवटीत स्थानिक चित्रकलाही नावारूपास आली. त्याचे काही नमुने इथल्या महालांच्या भिंतींवर बघायला मिळतात. 


मोठ्या उत्सुकतेने आम्ही किल्ल्याच्या आवारात शिरलो. गर्दी फारशी नव्हतीच. तेवढ्यात एक जण गाईड हवा का म्हणून विचारायला आला. अशा फारशा परिचित नसलेल्या ठिकाणी माहितगार असावा म्हणून आम्ही त्याला सोबत घेतले. किल्ल्याचा आवार प्रशस्त होता. त्याची रचना थोडीफार फतेहपुर सिक्री येथील महालाशी मिळती-जुळती होती. इथे आनंद महाल, परवीन महाल, जहांगीर महाल, असे अनेक महाल आहेत. त्यांपैकी जहांगीर महाल हा त्याच्या स्थापत्यसौंदर्यासाठी सुप्रसिद्ध आहे. बुंदेला राजा बीर सिंग देव याचे मुघलांशी मैत्रीचे संबंध होते. विशेषतः जहांगीरशी त्याची खास मैत्री होती. जहांगीरच्या ओरछा भेटीसाठी त्याने हा खास महाल बांधला. पाच माजले आणि आठ सज्जे असलेला हा महाल म्हणजे खरोखरच एक आश्चर्य आहे. 




जहांगीर महालातली भित्तीचित्रे 
आमच्या गाईडने त्याची माहिती पूर्ण करून आम्हाला जहांगीर महालाच्या प्रवेशद्वाराशी आणून सोडले. मग मी आणि प्रियांक गप्पा मारता मारता महाल फिरू लागलो. महालाची प्रत्येक भिंत नक्षीकामाने सजवलेली होती. सज्ज्यांवरच्या कोपऱ्यांत छत्र्या बांधलेल्या होत्या.  तिसऱ्या मजल्यावर मुख्य दरबार होता. इथे छतावर सुरेख चित्रे साकारलेली होती. एका सज्ज्यावरून दुसऱ्या साज्ज्यावर जायला बांधेलेले चिंचोळे जिने चक्रावून टाकत होते. आम्ही अक्षरशः प्रत्येक मजल्यावर आणि प्रत्येक सज्ज्यावर जाऊन फोटो काढत होतो. सगळ्यात उंच जागेवरून संपूर्ण शहराचा वेधक नजारा दिसत होता. सगळे माजले बघून झाल्यावर आम्ही महालाच्या मध्यवर्ती भागात आलो. महालाचा संपूर्ण आवाका इथून लक्षात येत होता. प्रत्येक सज्ज्याच्या खालच्या बाजूने हत्तींच्या शिल्पाकृती घडवलेल्या होत्या. लाकडी दरवाजेही उत्तमोत्तम चित्रांनी सजवलेले होते. भारतीय आणि मुघल शैलीचं मिश्रण इथे प्रत्येक शिल्पाकृतीत दिसत होतं. दुपारचं प्रखर उन महालाच्या खिडक्यांतून झिरपत आत येत होतं. त्या कवडशांनी तिथल्या शिल्पाकृती अजूनच उठून दिसत होत्या. किती फोटो काढू किती नको असं झालं होतं. तासभर तिथे घालवून आम्ही तिथून बाहेर पडलो.

सज्ज्याखाली घडवलेल्या गजमूर्ती  

जहांगीर महालाची मागची बाजू 

महालाचा मध्यवर्ती भाग 

सर्वोच्च सज्ज्यावरून दिसणारे दृश्य 

रामराजा मंदिराचे प्रवेशद्वार 
किल्ल्याच्या बाहेरच होतं राम राजा मंदिर. हे मंदिर म्हणजे ओरछाचा मध्यवर्ती भाग. शहरातले जीवन या मंदिराच्या आसपास फिरते. असं म्हणतात की, ओरछाची राजकन्या गणेशा कुंवारी हिने अयोध्येहून रामाची मूर्ती इथे आणली. मोठे मंदिर बांधायची तिची इच्छा होती. मंदिर पूर्ण होतंय तोपर्यंत तिने तिच्या राहत्या महालातच मूर्ती स्थापित केली. एकदाचे मंदिर बांधून झाले, आणि मूर्तीची स्थापना तिथे करायचे ठरले. पण मूर्ती काही जागची हलेना! मग शेवटी त्या राहत्या महालालाच मंदिर घोषित करण्यात आले. त्यामुळे या मंदिराला ना कळस ना गाभारा. एखाद्या महालाचे असते तसे प्रवेशद्वार आणि अंतःपुरात रामाची मूर्ती. विशेष म्हणजे इथे रामाला गावाचा राजा म्हणून पुजले जाते. म्हणून नाव रामराजा. मंदिरात कसलासा उत्सव सुरु होता. त्यामुळे भाविकांची बरीच गर्दी होती. आम्ही नंतर सावकाश दर्शन घेऊ असा विचार करून चतुर्भुज मंदिराकडे वळलो.

क्रमशः